Mumbai-Goa Highway
Mumbai-Goa Highway Tendernama
कोकण

Mumbai-Goa Highway : निधी मंजूर होऊन दीड वर्षे झाली तरीही रखडपट्टी

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई-गोवा महामार्गाच्या (Mumbai-Goa Highway) पनवेल ते इंदापूर या पहिल्या टप्प्याची रखडपट्टी अद्याप संपलेली नाही. निधी मंजूर होऊन दीड वर्ष झाले तरी या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही.

पनवेल-ते इंदापूर मार्गाच्या डागडुजीवर महामार्ग प्राधिकरणाकडून आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत. तरी एक किलोमीटर रस्‍ताही सुस्थितीत नाही. यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून ८४ किलोमीटरचे काँक्रीटीकरणाच्या कामाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली. कासू ते इंदापूर हा ४२ किमीचा पहिल्या टप्प्याचे काम मेसर्स कल्याण टोल इन्फ्रा लिमिटेड यांना देण्यात आले. याचे कार्यादेश १८ नोव्हेंबर रोजी काढण्यात आले तर दुसऱ्या टप्प्याचे पनवेल ते कासू दरम्यानचे ४२.३०० किमीचे काम मेसर्स जे.एम. म्हात्रे इन्फ्रा कंपनीला दिले आहे. असे असले तरी टटेंडर प्रक्रियेत अडकलेल्या काँक्रीटीकरणाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही.

वाहतुकीसाठी योग्य नसतानाही राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने न्यायालयाला सादर केलेल्या अहवालामध्ये हा टप्पा वाहतुकीसाठी सुस्थितीत असल्याचे नमूद केले आहे. कोकणातील नैसर्गिक आपत्तींचा सामना करून चाकरमानी शहरात नोकरी व्यवसायासाठी येतात. मात्र महामार्गाावरील प्रवास करताना त्‍यांना कसरत करावी लागते, अशी नागरिकांची सार्वत्रिक तक्रार आहे.

दरम्यान, पनवेल ते इंदापूर महामार्गाची अवस्था खूपच बिकट आहे. पहिल्या टप्प्याच्या कामाच्या प्रारंभासाठी कल्याण टोल इन्फ्रा या कंपनीने सिमेंट प्लान्ट, डबर क्वॉरी, यंत्रसामुग्री यासारख्या प्राथमिक सुविधांची जमवाजमव सुरू केली आहे. हे काम चांगल्या दर्जाचे आणि खड्ड्यांची कायमस्वरूपी डोकेदुखी दूर करणारे असेल, अशी माहिती यशवंत घोटकर, प्रकल्प संचालक, राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी दिली.