Mumbai-Goa Highway
Mumbai-Goa Highway Tendernama
कोकण

मुंबई-गोवा मार्ग मिशन मोडवर पूर्ण करा; मंत्री चव्हाणांचे निर्देश

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) अपूर्ण रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. तसेच या महामार्गावरील इंदापूर ते झाराप दरम्यानच्या चौपदीकरणाचे काम जलदगतीने पूर्ण करावे. महामार्गावरील अपूर्ण राहिलेले कामे पूर्ण करुन जनतेला तातडीने दिलासा द्यावा अशी सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी दिल्या.

मुंबई-गोवा महामार्गावरील अपूर्ण राहिलेल्या कामासंदर्भात मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकार्यांसमवेत सविस्तर आढावा घेतला. यावेळी मंत्री चव्हाण यांनी पनवेल ते इंदापूर या मार्गावरील कासू ते इंदापूर टप्पा क्र. १, पनवेल ते कासू (वडखळजवळ) टप्पा क्र.२ आदी रस्त्याची सध्यस्थिती, या मार्गावरील दुरुस्तीचे काम, त्याचप्रमाणे इंदापूर ते झाराप या रस्त्याचे बळकटीकरण व चौपदीकरणाच्या कामाचा आढावा घेतला. ही सर्व कामे तांत्रिकदृष्ट्या कशा पध्दतीने जलदगतीने पूर्ण करण्यात येतील याबाबत आवश्यक सूचना संबंधित अधिकार्यांना दिल्या.

महामार्गावरील परशुराम घाट, कशेडी घाट आदी घाट रस्त्याच्या लांबीतील उतारांचे स्थिरीकरण करुन अपघातमुक्त करण्याबाबत तसेच हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासंदर्भात सूचना मंत्री चव्हाण यांनी दिल्या. या कामातील ज्या तांत्रिक व प्रशासकीय अडचणी असतील त्या दूर करण्याच्यादृष्टीने सर्वांनी तातडीने कार्यवाही करावी असे निर्देशही मंत्री चव्हाण यांनी दिले. परशुराम घाटातील ग्रामस्थांचे स्थानांतरण करण्यासाठी २ कोटी निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग करण्यात आलेला आहे, तो तात्काळ संबंधितांना वितरीत करण्यात यावा असे निर्देश मंत्री चव्हाण यांनी यावेळी दिले.