Nagpur
Nagpur Tendernama
तगादा (तक्रार, गाऱ्हाणी, दाद)

तगादा : 'जी-20'नंतर उपराजधानीत घाणीचे साम्राज्य

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : शहरात मागील महिन्यात झालेल्या जी-20 परिषदेसाठी महापालिकेने महिनाभर स्वच्छतेला महत्त्व दिले. त्यामुळे शहरातील रस्ते, काही प्रमाणात वस्त्याही चकचकीत झाल्या. उपद्रव शोध पथकाने रस्त्यांवर थुंकणे, मूत्र विसर्जन करणाऱ्यांवर जोमात कारवाई केली. परंतु जी-20 परिषदेनंतर महापालिका सुस्त झाल्याचे रस्त्याच्या बाजूला पडलेल्या कचऱ्यावरून दिसत आहे. शहरात दिवसेंदिवस कोरोना संक्रमितांची संख्या वाढत असल्याने खुल्यावर कचरा दिसने आरोग्याला सुद्धा घातक आहे. एवढेच नव्हे तर उपद्रव शोध पथकही थंडावल्याचे गेल्या काही दिवसांतील कारवाईच्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.

जी-20 परिषदेनिमित्त शहरात विदेशी पाहुण्यांसाठी महापालिकेने दोन महिन्यांपासून स्वच्छता, रंगरंगोटी, पादचारी मार्ग दुरुस्ती, रस्ते दुरुस्ती, हिरवळ लावण्याची कामे केली. जी-20 परिषदेच्या काळात शहरातील सर्वच स्तरातील नागरिकांनी महापालिकेवर कौतुकाचा वर्षाव केला. शहराची सजावट, आकर्षक रोषणाईवर नागपूरकरही खुश झाले. या काळात त्यांना शहराचे 'न भुतो' असे रुप दिसले. नागरिकांनीही स्वच्छतेसाठी सहकार्य केले. परंतु या परिषदेनंतर नागरिकांनीही अस्वच्छता करण्यास सुरुवात केली तर महापालिकेचे कर्मचारीही सुस्त झाल्याचे दिसत आहे.

जी- 20 निमित्त काही कामांमुळे शहर अद्यापही सुंदर दिसत असले तरी काही भागात विद्रुपीकरण सुरू झाल्याचे दिसत आहे. धंतोली येथे तकिया येथील मुख्य रस्त्याच्या बाजूलाच कचऱ्याचा ढिगारा दिसून येत आहे. एवढेच नव्हे वर्धा मार्गावर तयार करण्यात आलेल्या वॉकर स्ट्रिट नागपूरकरांसाठी उत्तम पर्वणी ठरला असला तरी येथील रस्त्याच्या बाजूला अद्यापही आय ब्लॉक बसविण्यात आले नाही. गेल्या काही दिवसांत महापालिकेने स्वच्छतेवर भर दिला. परंतु महापालिकेची स्वच्छता त्यांच्या फेसबुक पेजवरून दिसून येत आहे. स्वच्छतेसाठी मोठी जनजागृती मोहिमच महापालिकेच्या फेसबुक पेजवरून सुरू आहे. प्रत्यक्षात मात्र त्याला कृतीची जोड नसल्याने शहरात अस्वच्छता वाढत आहे. अश्यात शहरात दिवसेंदिवस कोरोना संक्रमित रुग्णांची सुद्धा संख्या वाढत आहे. यावर सुद्धा महापालीकेने लक्ष देण्याची गरज आहे.

वर्धा मार्गावर अनेक ठिकाणी असे दृश्य दिसत आहे. आतापर्यंत ही कामे पूर्ण होणे अपेक्षित होते. महिनाभरात वर्धा मार्ग सुशोभीकरण करण्यात आले. परंतु शिल्लक कामांना अद्यापही हात लागल्याचे दिसत नाही. त्यामुळे महापालिकेचा सुस्तपणा आता लक्षात येत आहे. शहरात थुंकणारे, रस्त्यावर मुत्र विसर्जन करणे, मोकळ्या जागेत कचरा टाकणाऱ्यांवरील कारवाईही थंडावली आहे. 1 मार्च ते 23 मार्च या काळात उपद्रव शोध पथकानेही थुंकणारे, मूत्र विसर्जन करणाऱ्यांवर कारवाई केली. या काळात 40 हजार ते 73 हजार रुपयांपर्यंत एका दिवसाला दंड वसूल करण्यात आला. परंतु त्यानंतर या महिन्यात दिवसाला किमान 30 ते कमाल 50 हजारांपर्यंतचा दंड वसूल करण्यात आला. त्यामुळे उपद्रव शोध पथकही थंडावल्याचे चित्र असून शहरात स्वच्छतेचा प्रश्न गंभीर झाला आहे.