
देऊळगाव राजे (Devulgaon Raje) : देऊळगाव राजे (ता. दौंड) येथील भीमा नदीवरील बंधाऱ्याजवळ आर्वीबेट ते आर्वीगाव दरम्यान नदीपात्रात बांधलेल्या दगडी भिंतीची पडझड झाली आहे. परिणामी बंधाऱ्याला सर्व ढापे टाकता येत नसल्याने पाणीसाठा कमी होत आहे. यामुळे नदीपात्रात नवीन सिमेंटची भिंत बांधण्याची मागणी दौंड व श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
भीमा नदीवर देऊळगाव राजे येथे बांधलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याचा पाण्याचा फुगारा आलेगावच्या हद्दीत जातो. बंधाऱ्याचा फुगारा राहण्यासाठी आर्वीबेट ते आर्वीगाव दरम्यान दगडी भिंत बांधली होती. परंतु सती तीन वर्षेही टिकली नाही. भिंत जीर्ण झाली असून, दोन ठिकाणी पडली व भराव वाहून गेला.
भराव वाहिल्याने आजही देऊळगाव राजे बंधारा पूर्ण क्षमतेने भरलेला नाही. तीन ढापेही पाणी साठवता येत नसल्याची वस्तुस्थिती आहे. दरवर्षी मातीचा भराव टाकण्यात येतो. परंतु पाण्याच्या फुगाऱ्यापुढे तो टिकत नाही. यांचा फटका उन्हाळ्यात शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. कमी साठ्यामुळे नदीपात्र लवकर कोरडे पडते. लोकवर्गणीतूनही शेतकऱ्यांनी अनेक वेळा भराव टाकलेला आहे.
भिंतीच्या दुरुस्तीसाठी साडेतीन कोटी मंजूर
यामुळे शेतकरी कायमचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी नदीपात्रात नवीन पूर्णपणे भिंत बांधण्याची मागणी करीत आहेत. दरम्यान, भिंतीच्या दुरुस्ती कामासाठी निधी मिळण्याकरिता आमदार राहुल कुल यांनी जलसंपदा विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. यामुळे भिंतीच्या दुरुस्तीसाठी साडेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
फायबरचे ढापे बसविण्याची मागणी
देऊळगाव राजे येथील बंधाऱ्याला अद्याप जुनेच लोखंडी ढापे बसविण्यात येतात. ते ढापे जीर्ण झाले आहेत. परिणामी बंधाऱ्यातून पाण्याची गळती होत आहे. यामुळे बंधाऱ्याला नवीन फायबर ढापे बसविण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
आर्वी गावाजवळील नदीपात्रातील दगडी भिंत ठिकठिकाणी पडल्यामुळे बऱ्याच वर्षांपासून बंधाऱ्यात पूर्ण क्षमतेने पाणी साठवता आले नाही. याचा उन्हाळ्यात फटका बसत आहे. राहिलेली दगडी भिंत जीर्ण झाली आहे. यामुळे नदीपात्रात नवीन सिमेंटची भिंत बांधण्याची गरज आहे.
- सुनील गिरमकर, माजी उपसरपंच, आर्वी अनगर ग्रामपंचायत
भिंतीच्या दुरुस्ती कामासाठी साडेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्याची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यामुळे लवकरच कामाला सुरवात होईल.
- शंकर बनकर, उपविभागीय अभियंता दौंड जलसंपदा विभाग