मुंबई (Mumbai) : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते दिवाळीत होण्याची शक्यता आहे. याआधी दोन ते तीन वेळा समृद्धीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होणार असल्याची चर्चा होती. परंतु, हे मुहूर्त लांबणीवर पडत गेल्याने आता दिवाळीत पहिला टप्प्याचे लोकार्पण होईल, अशी शक्यता आहे.
महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन शहरांना समृद्धी महामार्गाद्वारे जोडले जात आहे. या महामार्गाच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान मोदी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात नागपूरमध्ये येणार आहेत. नागपूर ते शिर्डीपर्यंतच्या समृद्धी महामार्गाच्या पहिला टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. त्याचे लोकार्पण दिवाळीत होणार आहे. नागपूर-मुंबई दरम्यानची वाहतूक सुलभ व्हावी, या उद्देशाने 31 जुलै 2015 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 701 किलोमीटरच्या समृद्धी महामार्गाची घोषणा विधानसभेत केली होती. प्रत्यक्षात राज्याच्या 10 जिल्ह्यांतून हा महामार्ग जात असला तरी, एकूण 24 जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाचा कॅन्सर हॉस्पिटल प्रकल्प तयार झाला आहे. या उद्घाटनाला सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित राहणार आहेत त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुद्धा उपस्थिती राहणार आहे. त्यामुळे राज्य सरकार सुद्धा याच वेळी समृध्दी महामार्गाच्या पहिल्या टप्याचे उद्घाटन करण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालय पंतप्रधान कार्यालयाशी संपर्कात असून, प्राथमिक स्तरावर पंतप्रधान यांनी उद्घाटनासाठी होकार दिल्याची माहिती आहे. त्यामुळे दिवाळीत समृध्दी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन २३ ऑक्टोंबर रोजी नागपुरात पार पडण्याची शक्यता आहे.
महामार्गाच्या बांधकामाच्या सुरुवातीला अनेक अडचणी आल्या आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे बोलले जात आहे. सरकारकडून वारंवार हा महामार्ग सुरू करण्यासंबंधी तारखाही घोषित करण्यात आल्या आहेत. यापूर्वीच्या सरकारकडून ऑक्टोबर 2021, 31 डिसेंबर 2021 आणि 31 मार्च 2022 ही तारीख देण्यात आली होती. मात्र, अजूनही समृद्धी महामार्गाचे काम अपूर्ण असल्याची माहिती आहे. आता ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होणार असल्याचे समजते.