.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मुंबई (Mumbai): यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कुठल्या टोल नाक्यांवर वाहनांना टोल माफी मिळणार आहे त्याची माहिती सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. ही टोल माफी मिळविण्यासाठी काय करावे लागणार आहे याची माहितीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
२३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील टोल नाक्यांवर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना व एसटी बसेसना टोलमाफी मिळणार आहे.
यासाठी “गणेशोत्सव 2025 – कोकण दर्शन” या नावाचे विशेष टोलमाफी पास देण्यात येणार असून त्यावर वाहन क्रमांक व वाहन मालकाची माहिती नोंदवली जाईल. हे पास संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस व वाहतूक विभागाकडे उपलब्ध असतील. परतीच्या प्रवासासाठी देखील हेच पास ग्राह्य धरले जाणार आहेत.
शासनाच्या आदेशानुसार ग्रामीण व शहरी पोलीस तसेच प्रादेशिक परिवहन विभागाने समन्वय साधून प्रवाशांना वेळेत पासेस उपलब्ध करून द्यावेत, तसेच या संदर्भात जाहिरात व सूचना प्रसिद्ध करून जनतेला माहिती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. हा निर्णय कोकणात जाणाऱ्या लाखो भाविकांच्या प्रवासाला मोठा दिलासा ठरणार आहे.