
मुंबई (Mumbai): मुसळधार पावसाने राज्यातील अनेक भागांना झोपडून काढले असून, त्याचा फटका रस्त्यांना बसला आहे. रस्त्यातील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. सरकारी पातळीवर या परिस्थितीची दखल घेतली जात असून, त्या दृष्टीकोनातून सरकारने पावले उचलण्यास सुरवात केल्याचे दिसते आहे.
राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने देखभाल व दुरुस्ती करण्याची गरज लक्षात घेऊन राज्य सरकारने राज्यातील रस्त्यांच्या वार्षिक देखभाल व दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत २०२५-२६ या कालावधीसाठी १२९६.०५ कोटी निधीस मंजुरी दिली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
मंत्री भोसले म्हणाले की, रस्ते हे राज्याच्या प्रगतीच्या प्राणवाहिन्या आहेत. सुरक्षित, दर्जेदार आणि खड्डेमुक्त रस्ते निर्मिती सरकारचे प्राधान्य आहे. या निधीच्या मंजुरीमुळे तातडीची दुरुस्ती कामे तर होणारच आहेत, शिवाय अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या कामांमध्ये पारदर्शकता आणली जाणार आहे. तसेच वृक्षारोपण व संवर्धन मोहिमेमुळे पर्यावरणपूरक विकासाला चालना मिळेल.
खड्डेमुक्त, सुरक्षित आणि टिकाऊ रस्ते उपलब्ध होतील. प्रवासाचा वेळ व इंधनाची बचत होईल. अपघात रोखता येतील. रस्त्यांच्या आजूबाजूला हरित पट्टा तयार होऊन पर्यावरण संतुलन राखले जाईल. डिजिटल साधनांमुळे कामांवर प्रभावी नियंत्रण मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
या निधीद्वारे राज्यातील रस्त्यांना नवसंजीवनी मिळणार आहे. खड्डे भरणे, तातडीची दुरुस्ती, पावसामुळे बाधित झालेल्या मार्गांची दुरुस्ती, तसेच पूरक कामे हाती घेण्यासाठी ही रक्कम उपयोगात आणली जाणार आहे. AMC (Annual Maintenance Contract) अंतर्गत ४३,०४३.०६ किलोमीटर रस्त्यांवरील खड्डे टप्प्याटप्प्याने भरले जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांना सुस्थितीतील रस्त्यावरुन सुरक्षित प्रवास करणे सोईस्कर होईल.
राज्यातील एकूण आठ प्रादेशिक विभागांतर्गत येणाऱ्या सर्व जिल्ह्यांमधील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. प्रत्येक विभागातील कामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी विशेष आराखडा तयार करण्यात आला आहे. केवळ दुरुस्तीच नव्हे तर कामांची गुणवत्ता तपासणे आणि मानक पद्धतींचे पालन होणे यावरही सरकारकडून काटेकोर लक्ष ठेवण्यात येणार आहे.
रस्त्यांची दुरुस्ती वेळेत व दर्जेदार व्हावी यासाठी शासनाने तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर AI आधारित ॲप विकसित करण्यात आले असून याच्या मदतीने रस्त्यांवरील खड्ड्यांचे स्थान, दुरुस्तीची स्थिती, तसेच कामांची वास्तविक वेळेत तपासणी करणे शक्य होणार आहे. या अँपच्या माध्यमातून पारदर्शकता वाढून नागरिकांनाही कामांच्या प्रगतीची माहिती उपलब्ध होणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांच्या दुतर्फा व दुभाजकांवर, तसेच शासकीय इमारतींच्या सभोवताली वृक्षारोपण करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम यावर्षीपासून राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी “वृक्ष लागवड व देखभाल प्रणाली अॅप” विकसित करण्यात आले आहे.
या अॅपच्या मदतीने वृक्ष लागवडीचे संनियंत्रण अचूकपणे करता येणार असून, वृक्ष संगोपनाची अद्ययावत माहिती शासनाला तात्काळ उपलब्ध होईल. हा उपक्रम पर्यावरण संवर्धनासोबतच रस्त्यांच्या सौंदर्यातही भर घालणारा आहे, असेही भोसले यांनी सांगितले.