
पुणे (Pune) : कात्रज नवीन बोगदा ते नवले पूल या सुमारे चार किलोमीटर परिसरात असणारा अतितीव्र उतार वाहन चालकांसाठी अक्षरशः जीवघेणा ठरत आहे. त्यातही डिझेल किंवा पेट्रोल वाचविण्यासाठी याच तीव्र उतारावर वाहने बंद करून चालविण्याचा वाहनचालकांचे ‘स्टंट’ही अपघातास कारणीभूत ठरत आहे. अतितीव्र उतार व वाहनचालकांचा बेफिकीरपणा, या दोन कारणांमुळे सर्वसामान्य नागरिकांचा जीव जात आहे.
कात्रज नवीन बोगदा ते नवले पूल हा चार किलोमीटरचा परिसर आहे. कात्रज बोगद्यापासून ते दरी पुलापर्यंत तसेच पूल संपल्यानंतरही धोकादायक वळणे व तितकाच धोकादायक तीव्र उतार आहे. नवीन बोगद्यातून वाहने बाहेर पडल्यानंतर लगेचच उतार सुरु होतो. अगोदरच वेगात असलेल्या वाहनांना या उतारावरून आणखीनच वेग मिळतो. त्यामुळे वाहने अक्षरशः प्रचंड वेगात धोकादायक वळणे पार करीत उतारावरून नवले पुलाच्या दिशेने येतात. विशेषतः बोगद्यापासून ते नवले पुलापर्यंत वाहन बंद केल्यानंतरही तीन ते चार किलोमीटरचे अंतर तीव्र वेगात अवघ्या काही सेकंदातच कापले जाते. अनेकदा अवजड वाहन चालकांकडून पेट्रोल किंवा डिझेल वाचविण्याच्या हव्यासापोटी वाहने बंद किंवा न्यूट्रल स्थितीत ठेवून या उतारावरून आणली जातात. परिणामी वाहनांमध्ये तांत्रिक बिघाड होऊन अपघात घडतात.
मुंबई-बंगळूर बाह्यवळण महामार्गालगतच्या परिसरात झालेल्या विस्तारीकरणामुळे बाह्यवळण महामार्गावर दुचाकी, रिक्षा, कॅबसह अन्य वाहनांचा मोठ्या प्रमाणात राबता वाढला आहे. तर दुसरीकडे ठिकठिकाणी ‘अपघातप्रवण क्षेत्र’, ‘वेगमर्यादा ६०’, ‘धोकादायक वळणे’, ‘तीव्र उतार’ असे असंख्य फलक, होर्डिंग महामार्गावर ठिकठिकाणी लावले आहेत. त्यानंतरही वाहनचालकांकडून वेगमर्यादेच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले जात आहे. तसेच भरधाव वेगातच एका लेनमधून दुसऱ्या लेनमध्ये अवजड वाहने जात असल्याने अपघातांची शक्यता वाढत आहे. तीव्र उतार, धोकादायक वळणे व अपघाताचे ठिकाण असल्याचे माहीत असूनही वाहनचालकांकडून नियमांना हरताळ फासत वाहने चालविली जात आहेत.
कात्रज नवीन बोगदा येथील महामार्गावरून मोठ्या प्रमाणात दुचाकी, रिक्षा, प्रवासी कार अशा वाहनांचा वापर सुरु आहे. अवजड वाहनांचा अपघात झाल्यानंतर त्यामध्ये संबंधित वाहनचालक अडकून त्यांना जीव गमवावा लागत आहे. विशेषतः दुचाकी, रिक्षा व अन्य छोट्या वाहनचालकांकडूनही भरधाव वेगात लेन कटिंग केली जाते.
नवीन बोगद्यापासून ते नवले पुलापर्यंत ठिकठिकाणी सातत्याने होणाऱ्या अपघातांमध्ये रस्त्याच्याकडेला लावलेले लोखंडी सुरक्षा कठडे, खांब तुटलेल्या अवस्थेत आहेत. अनेक ठिकाणी रम्बलर्सवरील रंग उडाले आहेत. रिफ्लेक्टर्सचा अजूनही अभाव आहे. वाहनांचा वेग मंदावू शकेल, अशा उपाययोजना अद्याप केलेल्या नाहीत. या महामार्गावर भुमकर चौक, नवले पूल ते वडगाव पूल या दरम्यान जास्त प्रमाणात अपघात झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचआयए) यासाठी उपाययोजना होत नसल्याची सद्यःस्थिती आहे.