सिहोरा (Sihora) : सिहोराकरांना पाणी पुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशन (Jal Jeevan Mission) अंतर्गत 2 कोटी रुपये खर्चाची नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. ही योजना वैनगंगा नदीकाठावरील पिपरी चुन्नी येथील 1970 मध्ये बांधण्यात आलेल्या जलसिंचन प्रकल्पावर साकारण्यात येत आहे. या योजनेमुळे गावातील पाणी समस्या कायमस्वरूपी सुटणार आहे.
सिहोराकरांना सध्या सिंदपुरी येथील पंपगृहातून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. ही योजना नाल्यावर निर्माण करण्यात आली आहे. उन्हाळ्यात ही योजना नागरिकांना पाणी पुरवठा करण्यास असमर्थ ठरत आहे. यामुळे गावकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने जलजीवन मिशन अंतर्गत नव्याने 1 कोटी 99 लाख 335 रुपये खर्चाची पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे.
वैनगंगा नदीकाठावरील पिपरी
चुन्नी गावाच्या शेजारी असणाऱ्या जलसिंचन प्रकल्पात ही योजना साकारण्यात येत आहे. हा जलसिंचन प्रकल्प 1970 साली शेतकऱ्यांनी साकारला होता. यानंतर विजेचे देयक थकल्याने शेतकऱ्यांनी बंद केला. प्रकल्प उभा असल्याने सिहोराकरांना पाणी पुरवठा करण्यासाठी तो उपयोगात आणला जाणार आहे.
पंपगृह ते सिहोरा गावापर्यंत 7090 मीटर अंतरापर्यंत जलवाहिनीचे काम करण्यात येणार असून, 94 लाख 75 हजार 186 रुपये खर्च केले जाणार आहेत. लांब पल्ल्याचे अंतर असल्याने जलवाहिनीचे मजबुतीकरण होणार आहे. याशिवाय गावात 4256 मीटरपर्यंत नवीन पाइप जोडणीचे काम होणार असून, 34 लाख 74 हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. प्रकल्पातील गाळ काढण्यासाठी 11 लाख 66 हजार 536 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
पंपगृह निर्मितीसाठी 48 हजार 215 रुपये तर तपासणी कार्यासाठी 2 लाख 93 हजार 690 रुपये खर्च केले जाणार आहे. उर्वरित निधी महावितरण आणि सोलर पंपच्या कामात खर्च केला जाणार आहे. योजनेच्या मंजुरीसाठी माजी सरपंच मधू अडमाचे आणि सरपंच रंजना तुरकर यांनी प्रयत्न केले आहेत.
जलजीवन मिशन अंतर्गत नवीन पाणी पुरवठा योजना गावकऱ्यांची पाणी समस्या सोडविण्यासाठी मदतीची ठरणार आहे. या योजनेची कामे जलद गतीने झाली पाहिजेत. प्रकल्पातील संपूर्ण गाळ काढण्यावर भर दिला पाहिजे. योजनेच्या पूर्णत्त्वावर लक्ष केंद्रित आहे, अशी माहिती उपसरपंच सलाम शेख यांनी दिली.