
मुंबई (Mumbai) : देशातील रेल्वे वाहतूक अधिक गतिमान करण्याच्या महत्वाकांक्षी उद्देशाने केंद्र सरकार रेल्वेसेवेच्या विकासाचे अनेक प्रकल्प राबवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्राच्या आर्थिक व्यवहारविषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीत देशाच्या विविध भागातील रेल्वेसेवेचा दर्जा उंचावणारे सुमारे १८ हजार ६५८ कोटी रुपये खर्चाचे चार नवे प्रकल्प मंजूर करण्यात आले. यात महाराष्ट्रातील गोंदिया-बल्लारशा या २४० किलोमीटर रेल्वे मार्गिकेच्या दुपदरीकरणासाठी ४८१९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
या प्रकल्पांच्या कार्यवाही काळात तीन कोटी ७९ लाख मनुष्यदिवसांची रोजगार निर्मिती होणार आहे. महाराष्ट्रातील गोंदिया-बल्लारशा रेल्वेच्या दुपदरीकरण प्रकल्पाचा यामध्ये समावेश झाल्याने राज्याच्या दळणवळण क्षेत्राला नवी गती प्राप्त होणार आहे. मागासलेपणातून विकसितपणाकडे वेगवान वाटचाल करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात नवी रेल्वे स्थानके उभारण्यास मंजुरी देऊन केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या विकासाच्या वाटचालीस वेग दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने रेल्वे मंत्रालयाच्या चार प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांचा एकूण खर्च 18,658 कोटी रुपये आहे. महाराष्ट्र, ओदिशा आणि छत्तीसगड या तीन राज्यांमधील 15 जिल्ह्यांना व्यापणाऱ्या या चार प्रकल्पांमुळे भारतीय रेल्वेचे जाळे सुमारे 1247 किलोमीटरने वाढणार आहे.
या प्रकल्पांअंतर्गत 19 नवीन स्थानके बांधली जातील, ज्यामुळे दोन आकांक्षीत जिल्ह्यांदरम्यान म्हणजे गडचिरोली आणि राजनांदगावमध्ये कनेक्टिव्हिटी वाढेल. मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्पामुळे सुमारे 3,350 गावे आणि सुमारे 47.25 लाख लोकसंख्येची कनेक्टिव्हिटी वाढेल. खरसिया - नया रायपूर - परमलकसा हा मार्ग बलोदा बाजार सारख्या नवीन क्षेत्रांना थेट कनेक्टिव्हिटी देईल, यामुळे या प्रदेशात सिमेंट प्लांटसह नवीन औद्योगिक युनिट्स स्थापन करण्याची शक्यता निर्माण होईल. कृषी उत्पादने, खते, कोळसा, लोहखनिज, पोलाद, सिमेंट, चुनखडी इत्यादी वस्तूंच्या वाहतुकीसाठी हे आवश्यक मार्ग आहेत. क्षमता वाढीच्या कामांमुळे 88.77 एमटीपीए (प्रतिवर्षी दशलक्ष टन) अतिरिक्त मालवाहतूक होईल. पर्यावरणपूरक आणि ऊर्जा कार्यक्षम वाहतुकीचे साधन असल्याने, रेल्वे हवामान बदल उद्दिष्टे साध्य करण्यात आणि देशाचा लॉजिस्टिक्स खर्च कमी करण्यात, खनिज तेल आयात (95 कोटी लिटर) आणि कार्बनडायऑक्साईड उत्सर्जन कमी करण्यात (477 कोटी किलो) मदत करेल. जे 19 कोटी झाडे लावण्याइतके आहे.
या प्रकल्पांमध्ये समाविष्ट बाबी:
संबलपूर - जरपडा तिसरी आणि चौथी लाईन
झारसुगुडा - ससोन तिसरी आणि चौथी लाईन
खरसिया - नया रायपूर - परमलकसा पाचवी आणि सहावी लाईन
गोंदिया - बल्हारशाह दुपदरीकरण