नागपूर (Nagpur) : रेती चोरीसाठी बनावट ईटीपी (रॉयल्टी) तयार करणारे मोठे रॅकेट नागपूर जिल्ह्यात सक्रिय आहे. या माध्यमातून मागील दोन वर्षांत सुमारे शंभर कोटी रुपयांची रेती चोरण्यात आली आहे. मात्र एका माजी मंत्र्यांचा रॅकेटला वरदहस्त लाभला असल्याने पोलिसांकडून थातूरमातूर कारवाई केली जात असल्याचे समजते. (Nagpur - Sand Mining - Devendra Fadnavis's District)
अलीकडेच राहुल खन्ना नावाच्या ट्रक मालकाला रेती चोरी करताना अटक करण्यात आली आहे. त्याच्या सहकाऱ्यांकडे एकूण १०३ बनावट ईटीपी आढळल्या आहेत. प्रत्यक्षात पाचशे ते सहाशे ईटीपीद्वारे रेती चोरी केली जात होती असा अंदाज आहे. सावनेर विधानसभा मतदारसंघाला मध्य प्रदेशची सीमा लागून आहे. येथून कन्हान नदी वाहत असते. दोन्ही राज्यातून बनवाट ईटीपी तयार केल्या जातात आणि दोन्ही राज्यात मोठ्या प्रमाणात रेती चोरी केली जाते. वाळूच्या सुधारित धोरणानुसार प्रत्येक घाटांवर सीसीटीव्ही लावणे बंधनकारक आहे. मात्र अद्याप कुठेही सीसीटीव्ही लावण्यात आलेले नाही. बनावट रॉयल्टीद्वारे कुठे रेती विकण्यात आली याचा तपास घेतला जात नाही. त्यामुळे यात अधिकारीसुद्धा गुंतले असल्याचे दिसून येते.
भाजपचे नागपूर जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी रेती चोरीतील सर्व माहिती पोलिसांना उपलब्ध करून दिली आहे. कोट्यवधीच्या चोरीची तक्रार मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात झालेले रेती घाटांचे लिलाव रद्द करावे आणि अडीच वर्षांत झालेल्या सर्व व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी पोतदार यांनी केली आहे. लिलावात रेती घाट घेणारा आणि त्याचा मूळ मालक, तसेच त्यांना आश्रय देणाऱ्या राजकीय नेत्यांचीही सीआयडीमार्फत चौकशी करावी अशी सुद्धा मागणी पोतदार यांनी केली आहे.