
लोणावळा (Lonavala) : पर्यटन नगरी असा नावलौकिक असणाऱ्या व निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या लोणावळा व खंडाळ्याचा पारा वाढत आहे.
एकीकडे पर्जन्यमान घटत असताना दुसरीकडे पर्यटननगरीचा पाराही सरासरी ३९ अंश सेल्सियसवर पोहोचला आहे. वाढती बांधकामे, जंगलतोड, पर्यावरण संतुलनाकडे दुर्लक्ष यामुळे जैवविविधतेसह स्थानिक पर्यटन व्यवसायावरही त्याचा परिणाम जाणवू लागला आहे.
लोणावळा शहराला भौगोलिकदृष्ट्या वाढीसाठी मर्यादित वाव आहे. मात्र, असे असताना भांगरवाडी, नांगरगाव, भुशी, वळवण, तुंगार्ली, खंडाळा भागांत मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. मात्र दुसरीकडे पर्यावरण संतुलन राखण्याकडे दुर्लक्ष होत आहे. नागरीकरण वाढत असल्याने लोणावळा नगरपालिका हद्दीमधील लोकसंख्या पन्नास हजारांच्यावर गेली आहे.
संवेदनशील भागांचे नुकसान
लोणावळ्यातील भुशी, रायवूड, तुंगार्लीतील पांगोळी, ठाकरवाडी, भुशी तसेच खंडाळा हा भाग तसा पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील मानला जातो. पर्यटन वाढत असताना निर्माण होत असलेला कचरा, उभे राहत असलेले सिमेंटचे जंगल आणि त्यासाठी होत असलेली जंगलतोड यामुळे येथील जैव विविधतेस हानी पोहोचत असल्याने पर्यावरणासही धोका निर्माण झाला असल्याचा निष्कर्ष आहे. वन्यप्राण्यांच्या अधिवासात मनुष्यप्राण्याचे अतिक्रमण सुरू असल्याने शहरात त्यांचा वावर सुरू झाला आहे.
बांधकाम पूर्णत्वाचे सरसकट दाखले
सरकारी यंत्रणांना हाताशी धरत धनदांडग्यांकडून लोणावळा परिसर, खंडाळ्यात मोठ-मोठ्या टेकड्या, डोंगर भुईसपाट करण्यात येत आहे. खंडाळ्यासारख्या संवेदनशील ठिकाणी टेकडीफोड होत आहे. प्रशासनाच्यावतीने काटेकोरपणे नियम पाळणे दूरच. मात्र बांधकाम झाल्यावर नियम धाब्यावर बसवत बांधकामांना सरसकट बांधकाम पूर्णत्वाचे दाखले दिले जात आहेत.
पर्यटनावर परिणाम
वाढलेल्या पाऱ्याने पर्यटनावर थेट परिणाम होत आहे. एरवी ३५ ते ३६ अंशाच्या पुढे न जाणारा पारा ३९ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. उकाड्यात वाढ झाल्याने पर्यटकांची संख्याही रोडावली आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेली ही केंद्रे फक्त पावसाळी पर्यटनस्थळे म्हणून उदयास येत असताना पर्यटक संख्याही घटत चालली आहे.
लोणावळा खंडाळ्यात म्हणावी तशी गर्दी पहावयास मिळत नाही. जलक्रीडेस पसंती मिळत असून कृत्रिम जलाशय, वॉटरपार्क, खासगी रिसॉर्टसमध्ये अजून म्हणावे तसे बुकिंग झाले नसल्याची माहिती हॉटेल व्यावसायिक अनिश गणात्रा यांनी दिली.
झाडांची कत्तल होत आहे. झाडे लावताना स्थानिक मातीत रुजणारी व येथील पर्यावरणास पूरक असणारीच झाडे लावण्याची गरज आहे. त्यासाठी स्थानिक वातावरण अभ्यासण्याची गरज आहे, मात्र यावर विचार होत नाही.
- विनय घोगले, नागरिक
वृक्षांचे संवर्धन व संगोपन केवळ दिखावा सुरू असून नियम कडक करत ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. प्रशासन यासाठी फारसे गंभीर दिसत नाही. त्यामुळे पर्यावरणाचा असमतोल वाढत आहे.
- सुभाष राशीनकर, नागरिक
सर्वत्र सिमेंट काँक्रिटीकरण वाढत आहे. त्या प्रमाणात झाडांची लागवड झाली पाहिजे. नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी होण्याची गरज आहे.
- गंगाराम मावकर, सदस्य, उच्च न्यायालय स्थापित तज्ज्ञ समिती