
पुणे (Pune) : हडपसर परिसरातील विविध भागांत महापालिकेने पाण्याच्या ६ टाक्या बांधल्या आहेत. पण जलवाहिनी न जोडणे, काम अर्धवट ठेवणे यामुळे मोठा भाग तीव्र पाणीटंचाईला सामोरे जात आहे.
महापालिका प्रशासनाने त्वरित ही कामे पूर्ण करून पाणीपुरवठा करावा, अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे.
काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, ओबीसी विभागाचे शहराध्यक्ष प्रशांत सुरसे, सचिन नेमकर, ऋषिकेश रणदिवे, पल्लवी सुरसे आदी या वेळी उपस्थित होते. पत्रकार परिषदेत प्रशांत सुरसे म्हणाले, ‘‘हडपसर गावठाण, गाडीतळ हा भाग गेल्या ६० वर्षांपासून महापालिकेत आहे, तर सातववाडी, गोंधळेकर, १५ नंबर, लक्ष्मी कॉलनी, आकाशवाणी, विठ्ठल नगर, ससाणेनगर, काळे बराटेनगर हा परिसर १९९७ पासून महापालिकेत आहे. पण आजही या भागात पुरेसे पाणी मिळत नाही. नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.’’
पुणे महापालिकेने २०१६, २०१७, २०१८ या कालावधीत तुकाईनगर येथे ३५ लाख लिटर, हडपसर बस डेपो येथे ४५ लाख लिटर, भुजबळ स्कीम येथे ३५ लाख लिटर, आकाशवाणी येथे ३५ लाख लिटर क्षमतेच्या दोन आणि साधना विद्यालय येथे ४५ लाख लिटर क्षमतेची टाकी बांधली आहे. यातील केवळ दोन टाक्यांचे काम अपूर्ण आहे.
पण अन्य चार टाक्या बांधून पूर्ण झाल्या आहेत. पण त्यात पाणीच येत नसल्याने नागरिकांना पाणी मिळत नाही. मग या टाक्या का बांधल्या याचे उत्तरही प्रशासन देऊ शकत नाही. पुढील सहा महिन्यांत टाक्यांचे काम पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी आयुक्तांकडे केली असल्याचे सुरसे यांनी सांगितले.