पुणे (Pune) : पुण्याहून धावणाऱ्या सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसला (Vande Bharat Express) प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत असल्याने मध्य रेल्वेने (Central Railway) या रेल्वेला २५ टक्क्यांपर्यंतच सवलत लागू होणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच पुण्याहून मुंबई व सोलापूरला जाणाऱ्या चेअर कारचा डबा असलेल्या रेल्वे गाड्यांना ही सवलत लागू होणार नाही. त्या सर्व गाड्यांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे रेल्वे बोर्डाने २५ टक्के सवलत देण्याच्या जो निर्णय घेतला त्याचा कोणताच फायदा पुणेकरांना होणार नाही.
देशात सध्या विविध रेल्वे मार्गावर २६ वंदे भारत एक्स्प्रेस धावतात. यातील बहुतांश गाड्यांना ५० टक्के पेक्षा कमी प्रतिसाद लाभतो आहे. रेल्वे बोर्डाने हा निर्णय घेताना कमी प्रतिसाद लाभत असलेल्या गाड्यांचे तिकिटात सवलत देऊन प्रवाशांना आकर्षित करणे हा हेतू आहे. मात्र त्यांनी यासाठी एसी चेयर कार असलेल्या गाड्यांची निवड केली आहे. पुण्याहून धावणाऱ्या चेअर कार असलेल्या कोणत्याही गाडीस प्रवाशांचा कमी प्रतिसाद नाही. सर्वच गाड्यांना ९० टक्के पेक्षा जास्त प्रतिसाद लाभतो.
रेल्वेची एक खेळी...
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सवलतीचे एक प्रकारचे गाजर दाखविले आहे. मुळात कोणत्याही चेअर कार असलेल्या गाड्यांना चेअर कारचे डबे अत्यंत कमी असतात. फार तर दोन ते तीन डबे असतात. मुळात डब्यांची संख्या कमी असल्याने प्रवाशाचा चांगला प्रतिसाद मिळतोच. या तुलनेत शयन दर्जाच्या वातानुकूलित डब्यांना प्रवाशांचा कमी प्रतिसाद लाभतो. चेअर कारच्या तुलनेत शयनयान डब्याचे तिकिटाचे दर जास्त असतात. मात्र, रेल्वेने तसे न करता संख्येने कमी असलेल्या डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांबाबत हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्याचा फायदा पुणेकरांना होणार नाही.
ज्या गाड्यांना प्रवाशांचा ५० टक्क्यांपेक्षा कमी प्रतिसाद लाभतो त्या गाड्याच्या बाबतीत हा निर्णय आहे. पुण्याहून धावणाऱ्या कोणत्याही गाडीस हा निकष लागू होत नाही. काही गाड्यांना तर १९० टक्के प्रतिसाद लाभतो. त्यामुळे सद्यःस्थितीत तर सवलतीचा निर्णय लागू होत नाही.
- डॉ. शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, मुंबई