
पुणे (Pune) : पुरंदरमधील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियमातील तरतुदीनुसार वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी आणि पारगावमधील सातबारा उताऱ्यांवर भूसंपादनाचे शेरे घालण्यास सुरवात झाली आहे.
यासंदर्भात शेतकऱ्यांच्या काही हरकती-सूचना असतील, तर त्या लेखी स्वरूपात नोंदविण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. आलेल्या हरकतींवर भूसंपादन अधिकारी सुनावणी घेऊन शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकणार आहेत.
भूसंपादनासाठी तीन उपजिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती केल्यानंतर त्यांनी भूसंपादन अधिनियमातील ३२(२)ची अधिसूचना काढली आहे. त्यानुसार भूसंपादन अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष जागेवर जाण्याचा आणि पाहणी करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे.
भूसंपादन करण्यात येणाऱ्या गावांतील जमिनींच्या खरेदी-विक्रीवर बंधने घातली आहेत. लवकरच जमीनमालकांना भूसंपादनाच्या नोटिसा बजावण्यात येणार आहेत. त्यानुसार संबंधित भूसंपादन अधिकाऱ्याकडे शेतकऱ्यांना हरकती नोंदविण्याचे आवाहन केले आहे.
विमानतळाबाबत आलेल्या हरकतींवर अधिकारी सुनावणी घेऊन शेतकऱ्यांना आपले म्हणणे मांडण्याची संधी देणार आहेत. एखतपूर, खानवडी आणि मुंजवडीतील शेतकऱ्यांना २५ मेपर्यंत हरकती नोंदविता येणार आहेत; तर वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण आणि पारगावमधील शेतकऱ्यांना २९ मेपर्यंत हरकती नोंदविता येणार आहेत.
संपादित होणारी जमीन :
वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी आणि पारगाव या सात गावांपैकी सर्वाधिक क्षेत्र पारगावमध्ये संपादित होणार आहे. या गावातील एक हजार ५४२ सर्व्हे नंबरमधील ९७२ हेक्टर जागा संपादित होणार आहे. त्या खालोखाल खानवडीतील ३८१ सर्व्हे नंबरमधील ४५१ हेक्टर जागा, कुंभारवळणमधील ४२४ सर्व्हे नंबर बाधित होत असून, या गावातील ३४१ हेक्टर क्षेत्राचे संपादन होणार आहे.
वनपुरीतील ३६२ सर्व्हे नंबर बाधित होत असून, त्यातील ३३० हेक्टर जमीन, उदाचीवाडीमधील १९९ सर्व्हे नंबरमधील २४० हेक्टर जमीन, एखतपूरमधील १४५ सर्व्हे नंबर बाधित होत असून, त्यातील २१४ हेक्टर आणि मुंजवडीमधील २२१ सर्व्हे नंबरमधील १२२ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे.