
पुणे (PMC) : वारजे-माळवाडीतील माई मंगेशकर रुग्णालयासमोरील पुलाच्या दोन्ही बाजूंना महापालिकेकडून झाडे लावून हिरवळ करण्यात आली आहे. यामुळे हा परिसराचे सौंदर्य वाढले होते, मात्र मागील काही दिवसांपासून व्यवस्थित निगा न राखल्याने ही झाडे व हिरवळ सुकली आहे.
वारज्याकडून चांदणी चौकाकडे जाताना सेवा रस्त्याच्या दोन्ही बाजूंना शोभेची झाडे व हिरवळ लावून यासाठी महापालिकेने ठिबक सिंचन प्रकल्पही तयार केला आहे. पण हे सिंचनाचे पाणी अनेकदा रस्त्यावर पडत असल्याने त्याचा फायदा झाडांना तुरळक प्रमाणात होतो. साहजिकच पुरेसे पाणी असतानाही पाण्याअभावी येथील झाडे वाळत आहेत.
प्रशासन एका बाजूला ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असे म्हणत असताना वारज्यातील या झाडांकडे दुर्लक्ष करत आहे. तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घुशी व उंदरांचा त्रास सुरू झाल्याने येथील जमीन पोकळ-भुसभुशीत झाली आहे. यामुळे या झाडांची मुळे कमकुवत झाल्याने ही झाडे धोकादायक झाली आहेत. यावर त्वरित उपाययोजना करण्याची गरज आहे.
या झाडांची व्यवस्थित निगा न राखल्याने पर्यावरण प्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच हरित लवादाचा आदेश असतानाही या भागातील झाडांची काळजी घेत जात नाही. याला महापालिका उद्यान विभाग जबाबदार असल्याचा आरोप वारजेकरांनी केला आहे.
या परिसरातील झाडांची उद्यान विभाग योग्य देखरेख करत आहे. हरित लवादाच्या आदेशाचे पालन योग्य पद्धतीने होत आहे. झाडांची मुळे घुशींनी खाल्ली असल्याने झाडे सुकली आहे. लवकरच उपाययोजना करून झाडे जगविणार आहे.
- हरीश राऊत, कनिष्ठ अभियंता, उद्यान विभाग
उद्यान विभागाने दुर्लक्ष केल्याने झाडे सुकली आहेत. ठिबक सिचंनचे पाणी झाडांना कमी व रस्त्यावर जास्त येते. सिंचनाच्या पाइपची त्वरित दुरुस्ती करावी. उद्यान विभागाने तातडीने उपाययोजना करून ही झाडे जगवावी.
- किरण बारटक्के, स्थानिक रहिवासी