पुणे (Pune) : खराडी चौक ते रक्षकनगर गोल्डकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर महापालिकेने (PMC) सांडपाणी वाहिनी टाकण्याच्या कामासाठी गेल्या आठ दिवसांपासून खोदाई सुरू केली आहे.
ठेकेदाराने खोदाईतून निघालेला मुरूम, तसेच माती रस्त्याच्या दिशेने टाकली आहे. मात्र योग्य ती खबरदारी न घेतल्याने या निसरड्या झालेल्या रस्त्यावर दुचाकीचालकाचा गाडी घसरून अपघात झाला. याबाबत दोषी व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
खराडी चौक ते रक्षकनगर गोल्डकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या डाव्या बाजूला यापूर्वी दोन जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. चार महिन्यांत पुन्हा नव्याने रस्त्याच्या उजव्या बाजूला खोदाई करून सांडपाणी वाहिनी टाकण्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे. प्रशासनाचे योग्य नियोजन नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. जनतेने भरलेल्या कररूपी पैशांचा अपव्यय थांबवावा, अशीही मागणी रहिवाशांनी केली आहे.
स्थानिक रहिवासी संतोष भरणे म्हणाले की, वास्तविक पावसाळा सुरू झाल्यानंतर शहरात खोदाईशी संबंधित कोणतीही कामे करणे उचित नाही. तरी देखील महापालिका कार्यक्षेत्रात पावसाळा सुरू झाल्यानंतर देखील मोठ्या प्रमाणात कामासाठी खोदाई सुरू आहे. खराडी परिसरात सांडपाणी वाहिनी, पावसाळी गटारे, पाणीपुरवठा वाहिन्यांसाठी मोठ-मोठे खड्डे खोदण्यात आले असून, मुरूम रस्त्यावर आलेला आहे. महापालिका अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदारास मुरूम उचलण्यास सांगावा, अन्यथा काम थांबवले जाईल.
खोदाई करताना रस्त्यावर माती टाकू नये, चालकांच्या सुरक्षेसाठी लाल-पांढरी पट्टी लावणे गरजेचे आहे. परंतु या ठिकाणी ठेकेदाराने पालिकेच्या खोदाई धोरणाप्रमाणे नियम, अटी-शर्तींचे पालन न करता नागरिकांच्या सुरक्षेची कोणतीही खबरदारी घेतली गेली नसल्याचे दिसून येते.
- श्वेता शर्मा, नागरिक