पुणे (Pune) : अमेरिकेतील डेट्रॉइट (Detroit, US) शहरातील वसाहतीप्रमाणेच चाकण (Chakan MIDC) येथील ऑटोमोबाईल कंपन्यांच्या औद्योगिक वसाहतीला ऑटोमोबाईल हब (Automobile Hub) म्हणून जगभरात ओळखले जाते. चाकण परिसरात बहुराष्ट्रीय कंपन्या आल्या. एमआयडीसीने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या जमिनीचे संपादन केले. या परिसराचा विकास झाला. परंतु येथील मुख्य रस्ते पुणे-नाशिक महामार्ग, चाकण-तळेगाव -शिक्रापूर मार्ग मात्र दुर्लक्षित राहिले आहेत. यासाठी हायस्पीड रेल्वेची गरज असल्याचे मत या भागातील उद्योजकांनी व्यक्त केले आहे. पुणे -नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे सुरू झाली तर उत्तर पुणे जिल्ह्याचा विकास होऊ शकतो. येथील शेतीमाल, औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांची मालाची ने आण होऊ शकते. त्यामुळे रोजगाराच्या संधी व इतर विकास होऊ शकतो, असे या उद्योजकांचे म्हणणे आहे.
चाकण येथील औद्योगिक वसाहतीमधील उद्योगधंद्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे काही उद्योगधंदे स्थलांतरीत होत आहेत. तर काही उद्योगधंदे येथे येत नाहीत, ही वास्तवता आहे. या परिसराचा विकास होण्यासाठी पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे हा एकच पर्याय आहे, असे मत उद्योजक, व्यावसायिक, शेतकरी यांचे व्यक्त केले आहे. एमआयडीसीचेही अनेक प्रश्न उद्योजकांना सतावत आहेत. वीज पुरवठ्याबाबतही उद्योजकांच्या अनेक समस्या आहेत. या समस्यामुळे औद्योगिक वसाहतीतील विकासाला चालना मिळण्या ऐवजी औद्योगिक वसाहत सध्या मंद गतीने सुरू आहे, असे उद्योजकांचे म्हणणे आहे. पुणे, नगर, नाशिक या तीन जिल्ह्यांमधून ही रेल्वे जाते. पुणे जिल्ह्यातील हवेली खेड, आंबेगाव, जुन्नर तालुके या रेल्वे प्रकल्पात आहे. या रेल्वे प्रकल्पात पुणे हे पहिले स्थानक असणार आहे.
महारेलने आवश्यक परवानग्या घेतल्या आहेत. नीती आयोगाने काही महिन्यापूर्वी या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखविला आहे. हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळासमोर सादर केला जाणार आहे. तो लवकर सादर करण्यात यावा. या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता द्यावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे विनंती केली आहे. त्याला रेल्वेमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे हा प्रकल्प चाकण तळेगाव तसेच मावळ, शिरूर तालुक्यातील औद्योगिक वसाहतीसाठी महत्त्वाचा आहे. पुणे जिल्ह्यात शेती मालाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.आणि काही शेती माल निर्यात होतो. तसेच इतर राज्यात पाठविला जातो. त्यामुळे या मालाची ने आण करण्यासाठी तसेच कंपन्यांच्या मालाची ने आण करण्यासाठी पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे अत्यावश्यक आहे.
- विजय बोत्रे, उद्योजक