
संगमनेर (Sangamner): येथील हायटेक बसस्थानक सध्या अस्वच्छतेच्या, बेवारशी व्यवस्थापनाच्या आणि सुरक्षा यंत्रणेच्या उदासीनतेच्या विळख्यात सापडले आहे.
बसस्थानकात कचऱ्याचे ढीग
कोट्यावधी रुपयांच्या खर्चातून उभारण्यात आलेले बसस्थानक नाशिक व पुणे जिल्ह्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी वसलेले असून, दररोज मोठ्याप्रमाणात प्रवासी ये-जा करतात; परंतु या बसस्थानकाची अवस्था पाहता ‘हायटेक’ही संज्ञा केवळ नावापुरती उरल्याचे चित्र आहे.
बसस्थानकाच्या आवारात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले असून, चार ते पाच दिवसांपासून हा कचरा उचलला जात नसल्याने परिसरात घाण वास सुटला आहे. इतकेच नव्हे तर डुक्कर व गाढवांचा मुक्त वावरही बसस्थानक परिसरात पाहायला मिळतो. जो प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांनाही त्रासदायक ठरत आहे.
खासगी वाहनांची बेकायदेशीर पार्किंग
दुसरीकडे, बसस्थानकाच्या सुरक्षिततेचा प्रश्नही गंभीर बनला आहे. बसस्थानकात दोन पोलिस बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असूनही प्रत्यक्षात पोलिस हजर नसतात. त्यामुळे एखादी अनुचित घटना घडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न आता प्रवासी आणि स्थानिक नागरिक विचारू लागले आहेत. सार्वजनिक ठिकाणी पोलिस अनुपस्थित असणे चिंताजनक असून, प्रशासनाची निष्क्रियता अधोरेखित करणारे ठरत आहे.
बसस्थानकाच्या आवारात खासगी वाहनांची बेकायदेशीर पार्किंग मोठ्या प्रमाणावर होत असून, वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या अतिक्रमणावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे.
फक्त नावापुरतेच ‘हायटेक’
हायटेक बसस्थानक सध्या नावापुरतेच ‘हायटेक’राहिले असून, प्रत्यक्षात अस्वच्छता, बेफिकीर व्यवस्था, वाहतूक अडचणी आणि सुरक्षा यंत्रणेचा अभाव या समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकवस्तीत असलेल्या या सार्वजनिक सुविधा केंद्राच्या देखरेखीचा अभाव, प्रशासनाचे दुर्लक्ष, वास्तव सर्वसामान्य प्रवाशांसाठी धोका निर्माण करणारे ठरत आहे. या बसस्थानकाच्या दुरवस्थेकडे तत्काळ लक्ष देणे गरजेचे आहे.