
सोलापूर (Solapur): माढा मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असणाऱ्या सुमारे ३९०० कोटी रुपयांच्या नीरा-देवघर प्रकल्पाचा केंद्रीय कृषी सिंचन योजनेत समावेश झाला आहे. प्रकल्पास केंद्रीय निधी गुंतवणुकीची मान्यता मिळाली असल्याची माहिती माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिली.
केंद्रीय कृषी सिंचन योजनेत सन २०१९ पासून नीरा-देवघर प्रकल्पाचा समावेश करण्यासाठी निंबाळकर प्रयत्नशील होते. नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या बैठकीत केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, रणजितसिंह नाईक- निंबाळकर, सीडब्ल्यूसीचे अध्यक्ष अतुल जयंत, सदस्य पाटणकर, चीफ इंजिनिअर शेंगर यांच्या उपस्थितीत या प्रकल्पासाठी केंद्रीय निधी गुंतवणुकीला अंतिम मान्यता देण्यात आली.
नीरा-देवघर प्रकल्पाला केंद्रीय निधीची मान्यता मिळाल्यामुळे माळशिरस तालुक्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत कालव्याचे काम पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रत्यक्ष केंद्रीय निधी उपलब्ध होताच टेंडर प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. दरम्यान, याच बैठकीत उरमोडी व जिहे-कटापूर योजनेलाही निधी व मान्यता मिळाली असल्याचे नाईक-निंबाळकर यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील, तत्कालीन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या सहकार्याने हा प्रकल्प गतिमान करता आला. राज्य सरकारनेही केंद्राकडे प्रकल्प शिफारस व निधी उपलब्ध होईपर्यंत राज्य निधीतून तरतूद केली होती. लवकरच हा प्रकल्प पूर्णत्वास जाईल, असेही नाईक निंबाळकर सांगितले.