
अहिल्यानगर (Ahilyanagar) : अतिक्रमण स्वतःहून काढा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा अल्टिमेटम आयुक्त यशवंत डांगे यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता. या अल्टिमेटमचा धसका घेत अनेकांनी आपल्या दुकानांसमोरील अतिक्रमणे स्वतःहून काढून घेतली. दरम्यान, ज्यांनी अतिक्रमण काढले नाही, त्यांच्यावर महानगरपालिकेच्या पथकाने कारवाई केली.
शहरातील अतिक्रमणांचा प्रश्न गंभीर झाला आहे. रस्त्यांवरील या लहान-मोठ्या अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. सिमेंटचे ओटे, पत्र्याचे शेड, लोखंडी जाळ्या, हातगाड्या, चहाच्या टपऱ्या, फळांच्या गाड्या, तसेच खाद्यपदार्थांच्या गाड्यांनी अनेक ठिकाणी रस्ते अडवले आहेत. त्याचा त्रास नागरिक व वाहनचालकांना सहन करावा लागत आहे.
या प्रश्नाची दखल घेत महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी शहरातील अतिक्रमणधारकांना दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. त्याची मुदत आज संपली, त्यामुळे अतिक्रमण विभागाच्या पथकाने सकाळपासूनच कारवाईला सुरूवात केली होती.
दरम्यान, आयुक्तांनी अल्टिमेटम दिल्याने मध्यवर्ती शहरात चितळे रोड, गंजबाजार, कापडबाजार, तसेच बालिकाश्रम रोडवर अनेकांनी स्वतःच अतिक्रमण काढून घेतली, तर कारवाईचा अल्टिमेटम देवूनही अतिक्रमण न काढणाऱ्यांवर पथथकाने कारवाई केली. माळीवाडा भागात कारवाई करण्यात आली.
वाडिया पार्क ते माळीवाडा वेस रस्त्यावरील हातगाड्या, टपऱ्या, फळांच्या गाड्या, चहाच्या टपऱ्या हटविण्यात आल्या. माळीवाडा वेस ते बसस्थानक चौक रस्त्यावरील अतिक्रमणे देखील हटविण्यात आली. कोठला परिसरात ही कारवाई करण्यात आली. कोठला भागात काही पक्क्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. महानगरपालिकेच्या या कारवाईमुळे बहुतांश रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला.
दोन दिवसांत अतिक्रमणे काढून घ्या, असा अल्टिमेटम आयुक्त तथा प्रशासक डांगे यांनी दिला होता. त्यांच्या अल्टिमेटमला अतिक्रमणधारकांनी अल्प प्रतिसाद दिला. कापडबाजार, गंजबाजार, चितळे रोड, बालिकाश्रम रोड परिसरात काहींनी आपली अतिक्रमणे स्वतःच काढून घेतले. परंतु अनेकांनी आयुक्तांच्या या अल्टिमेटमकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे अतिक्रमण विरोधी पथकाला कारवाई करणे भाग पडले.
आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. माळीवाडा व कोठला भागातील अतिक्रमण हटविण्यात आले आहे. ही कारवाई सुरूच राहणार आहे. कच्ची-पक्की दोन्ही अतिक्रमणे पथकामार्फत हटविण्यात येणार आहे.
- आदित्य बल्लाळ, प्रमुख, अतिक्रमण विभाग