

मुंबई (Mumbai): मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बांधण्यात येणाऱ्या नियोजन भवन इमारतीचा भूमीपूजन सोहळा वांद्रे पूर्व येथे पार पडला. मुंबई उपनगरचे पालकमंत्री तसेच माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी भूमिपूजन करून या इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ केला.
भूमिपूजन सोहळ्यास सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार संजय उपाध्याय, जिल्हाधिकारी सौरभ कटियार तसेच जिल्हा नियोजन अधिकारी संजय शिंदे उपस्थित होते.
बांद्रा (पूर्व) येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ‘नियोजन भवन’ उभारण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र नियोजन भवन उभारण्याच्या सूचनेनुसार हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
या प्रकल्पाला 19 नोव्हेंबर 2025 रोजी सुमारे 741.04 लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली असून, 6 फेब्रुवारी 2026 रोजी तांत्रिक मान्यताही प्रदान करण्यात आली आहे. एकूण 1031.25 चौरस मीटर बांधकाम क्षेत्र असलेल्या या इमारतीचे काम दोन टप्प्यांत पूर्ण केले जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात तळमजला आणि एक मजला असलेली मुख्य इमारत उभारण्यात येणार आहे. यामध्ये 300 आसनक्षमतेचे भव्य सभागृह, दोन स्वतंत्र ग्रीन रूम, किचन व पॅन्ट्री तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सुविधा उभारल्या जाणार आहेत. पहिल्या मजल्यावर जिल्हा नियोजन समितीचे कार्यालय आणि लहान सभागृहाचीही व्यवस्था असेल.
दुसऱ्या टप्प्यात अंतर्गत सजावट, सभागृहाचे ध्वनीरोधक काम, फॉल्स सिलिंग, दरवाजे तसेच आवश्यक फर्निचर आणि इतर पूरक सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री ॲड. शेलार यांनी सर्व संबंधितांना यावेळी दिल्या.