
मुंबई (Mumbai) : महाराष्ट्रातील टोल वसुली विरोधात सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आक्रमक झाले आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या आठ वर्षांपूर्वी बंद करण्यात आले वा टोल आणि उद्योजकांना दिलेल्या नुकसान भरपाईची माहिती पुढे आली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने २०१६ मध्ये बंद केलेले १२ आणि ५३ नाक्यावर सूट दिल्यामुळे उद्योजकांस ७९८.४४ कोटी रुपयाचा परतावा आणि नुकसान भरपाई दिली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागातील ३८ टोल नाक्यापैकी ११ टोल बंद केल्यामुळे २२६.५१ कोटी रुपये परतावा रक्कम आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांचेकडील ५३ टोल नाक्यापैकी १ टोल नाका बंद झाला त्यासाठी परतावा रक्कम १६८ कोटी रुपये आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडील उर्वरित १९ प्रकल्पावरील २७ टोल नाक्यांवर कार, जीप तसेच एसटी आणि स्कूल बसेसना टोल टैक्समध्ये सूट दिल्यामुळे उद्योजकास वर्ष २०१५-१६ करीताची भरपाई रक्कम १७९.६९ कोटी आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडील १२ प्रकल्पावरील २६ टोल नाक्यांवर कार, जीप तसेच एसटी आणि स्कूल बसेसना टोल टैक्समध्ये सूट दिल्यामुळे उद्योजकास वर्ष २०१५-१६ करीताची भरपाई रक्कम २२४.२४ कोटी रुपये असल्याची माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकारात पुढे आणली आहे.
बंद टोल नाका
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांचेकडील पैकी १ टोल नाका बंद झाला. चंद्रपूर येथील रेल्वे ओव्हर ब्रिज तडाली (आरओबी) बंद झाला असून त्यासाठी एक रक्कमी १६८ कोटी रुपये दिले गेले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडील ३८ पैकी ११ टोल नाका बंद केले गेले. त्यात अलिबाग-पेण-खोपोली, पुण्यातील मावळ येथील वडगाव-चाकण-शिक्रापूर प्रकल्पातील २ टोल नाके, मोहोळ-कुरुळ-कामती-मंद्रुप, सोलापूर येथील टेंभूर्णी -कुर्डूवाडी-बार्शी लातूर वाडी, अहमदनगर करमाळा- टेंभूर्णी रस्ता, नाशिक-वणी रस्ता, भुसावळ येथील यावल फैजपूर रस्ता आणि खामगाव वळण रस्ता अशी नावे आहेत.