

मुंबई (Mumbai): ठाणे - मिरा भाईंदर परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून ८,५५३ कोटींच्या मेट्रो-१० प्रकल्पासाठी लवकरच टेंडर प्रक्रिया सुरू होणार आहे. CM Devendra Fadnavis आणि DCM Eknath Shinde यांच्या सूचनेनुसार प्रकल्पाला गती देण्यात आली असून, २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
ठाणे - मिरा भाईंदर पट्ट्यातील वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मेट्रो-१० प्रकल्पाला गती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गायमुख (रेतीबंदर) ते छत्रपती शिवाजी महाराज चौक (घोडबंदर) या ९.७ किलोमीटर लांबीच्या उन्नत मार्गासाठी लवकरच टेंडर प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
या प्रकल्पासाठी सुमारे ८,५५३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून पुढील तीन ते चार महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. २०२९ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.
दहिसर - काशीगाव मार्गाचा विस्तार करून तो गायमुखपर्यंत नेण्यात येणार आहे. त्यामुळे पश्चिम उपनगर आणि ठाणे परिसरातील प्रवास अधिक जलद आणि सुलभ होण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, घोडबंदर रोडवरील तीव्र वाहतूक कोंडी लक्षात घेऊन रस्त्याचे रुंदीकरणही हाती घेण्यात आले आहे. सध्या ३० मीटर रुंदी असलेला रस्ता ६० मीटरपर्यंत वाढवण्यात येणार असून, या कामासाठी सुमारे १,२०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
या प्रकल्पासाठी आवश्यक जमिनीचे अधिग्रहण Mumbai Metropolitan Region Development Authority मार्फत करण्यात येणार असून त्यासाठी १५० ते २०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. आदिवासी जमिनींच्या प्रश्नाचा विचार करून शासकीय दराने भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याशिवाय ठाणे, मिरा भाईंदर आणि नवी मुंबई येथे पॉड टॅक्सी प्रकल्प पीपीपी तत्त्वावर राबवण्याची तयारी सुरू आहे. पुढील सहा महिन्यांत याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) पूर्ण केला जाणार आहे. महावितरणच्या खांबांच्या स्थलांतरासाठी ७५ कोटींची कामे पुढील तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.