
मुंबई (Mumbai): पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर (तवा) आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्ग यांना फ्रेट कॉरिडॉर या शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गाने भरवीर (ता. चांदवड, जि. नाशिक) येथे यांना जोडण्यात येणार आहे. या १०४. ८९८ किलोमीटरच्या शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून हाती घेण्यात येईल. प्रकल्पाकरिता हूडकोकडून १ हजार ५०० कोटी रुपयांचे कर्ज उभारण्यात येणार आहे. या कर्जासह २ हजार ५२८ कोटी ९० लाख रुपयांच्या तरतूदीस देखील मंत्रिमंडळाने मान्यता दिली. प्रकल्पाचे काम ३ वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहे.
वाढवण ट्रान्सशिपमेंट हे बंदर वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेड च्या माध्यमातून बांधले जात आहे. वाढवण बंदराच्या माध्यमातून जलमार्गे होणारी आंतरराष्ट्रीय मालवाहतूक देशातील सर्व भागापर्यंत वेगाने व किफायतशीर किंमतीमध्ये पोहोचण्याच्या दृष्टीने हे बंदर हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाला जोडण्याचा हा प्रस्ताव आहे.
केंद्र शासनाच्या भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने सागरमाला प्रकल्पांतर्गत सध्या वाढवण बंदर ते तवा (रा.म.४८) पर्यंत ३२. कि.मी. महामार्गाचे काम हाती घेतले आहे. समृध्दी महामार्गावरुन वाढवण बंदराकडे जाण्याकरीता भरवीर-आमणे (समृध्दी महामार्ग) ते वडोदरा-मुंबई द्रुतगती मार्गावरून जावे लागते. त्यामुळे जवळजवळ ८२ कि.मी. लांबीचा अनावश्यक प्रवास करावा लागतो.
वाढवण बंदराच्या भविष्यातील मोठयाप्रमाणावरील वाहतूक वर्दळीचा विचार करता विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील वाहतूक वर्दळीस उपयुक्त अशा महामार्गाची निर्मिती अत्यंत आवश्यक आहे. हा शिघ्रसंचार द्रूतगती महामार्ग पालघर जिल्ह्यातील डहाणू, विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा या आणि नाशिक जिल्ह्यातील त्रंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यातून जाणार आहे. या महामार्गामुळे तवा भरवीर हे वडोदरा - मुंबई एक्सप्रेस मार्गे अंतर समृद्धी महामार्ग १८३.४८ किमी ऐवजी १०४.८९८ किमी होणार आहे. त्यामुळे वाहतुकीच्या अंतरात ७८.५८२ किमी बचत होणार आहे.
वाढवण बंदर ते भरवीर हा प्रवास सद्याच्या ४ - ५ तासावरून साधारणतः १ ते १.५ तासावर येईल, यामुळे वाहतुकीच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. दळणवळण गतीमान झाल्याने पालघर, नाशिक जिल्ह्यांमधील लघु, मध्यम व अवजड उद्योग कारखाने, कृषी-विषयक संस्था, शिक्षणसंस्था, आयटी कंपन्या, कृषी उद्योग केंद्रांना याचा लाभ होणार आहे. यातून स्थानिकांना उत्तम रोजगार व उत्तम बाजारपेठ उपलब्ध होईल.