

मुंबई (Mumbai): पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणला जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी कोल्हापूर ते वैभववाडी या १०८ किमी लांबीच्या नवीन रेल्वे लाईन प्रकल्पाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) आता तयार झाला असून, यामुळे या भागातील दळणवळणाला नवी गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली.
डीपीआर तयार झाला असला तरी, या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी आता विविध टप्प्यांवर मंजुरी मिळणे आवश्यक आहे. राज्य सरकार आणि संबंधित यंत्रणांशी यावर चर्चा केली जाईल. नीती आयोग आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून या प्रकल्पाचे सविस्तर मूल्यांकन केले जाईल. विविध विभागांच्या परवानग्या मिळाल्यानंतरच कामाची निश्चित कालमर्यादा स्पष्ट होऊ शकेल.
सध्या कोल्हापूरचे श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस हे देशातील प्रमुख शहरांशी जोडलेले आहे. सद्यस्थितीत कोल्हापूरहून एकूण ३० रेल्वे गाड्या धावत असून, याद्वारे मुंबई, पुणे, दिल्ली, अहमदाबाद आणि नागपूर यांसारख्या महत्त्वाच्या शहरांशी कोल्हापूर थेट जोडले गेले आहे. वैभववाडी मार्ग पूर्ण झाल्यास कोकण रेल्वेशी थेट संपर्क प्रस्थापित होऊन दक्षिण भारताकडे जाणे अधिक सोयीचे होईल.
रेल्वे मंत्र्यांनी स्पष्ट केले की, अशा मोठ्या प्रकल्पांची पूर्तता ही अनेक तांत्रिक आणि प्रशासकीय बाबींवर अवलंबून असते. त्यात प्रामुख्याने खासगी आणि सरकारी जमिनीचे संपादन, मार्गातील वनक्षेत्रासाठी आवश्यक परवानग्या, सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील कठीण भौगोलिक रचना, विविध प्राधिकरणांकडून मिळणाऱ्या परवानग्या आणि निधीची उपलब्धता.
एखाद्या रेल्वे मार्गाला मंजुरी देताना रेल्वे प्रशासन काही विशिष्ट निकषांचा विचार करते. यामध्ये प्रस्तावित मार्गावरील वाहतुकीचा अंदाज, सामाजिक-आर्थिक आवश्यकता, गर्दीच्या मार्गांचे सुलभीकरण आणि राज्य व केंद्र सरकारकडून होणारी मागणी यांचा समावेश असतो.
कोल्हापूर-वैभववाडी हा मार्ग केवळ दोन शहरांना जोडणारा नसून, तो पश्चिम महाराष्ट्रातील व्यापार आणि पर्यटनासाठी गेम चेंजर ठरू शकतो.