Aditya Thackeray, EKnath Shinde, Devendra Fadnavis
Aditya Thackeray, EKnath Shinde, Devendra Fadnavis Tendernama
टेंडर न्यूज

'शिंदे-फडणवीस अजून एक प्रकल्प राज्याबाहेर चाललाय, माहिती आहे का?'

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : फॉक्सकॉन-वेदांत सेमीकंडक्टर प्रकल्प आणि बल्क ड्रग पार्कनंतर आता महाराष्ट्राला वैद्यकीय उपकरणांच्या निर्मितीसाठीच्या ‘मेडिसीन डिवाइस पार्क’ योजनेलाही मुकावे लागल्याचा आरोप शिवसेना नेते आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केला आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला याबद्दल माहिती आहे का, असा प्रश्न विचारत सत्ताधाऱ्यांवर ठाकरे यांनी निशाणा साधला आहे.

या आधीच महाराष्ट्राचे दोन प्रकल्प इतर राज्यात गेल्यानंतर आता महाराष्ट्राला मेडिसीन डिवाइस पार्क योजनेला देखील मुकावे लागले आहे, असा आरोप ठाकरे यांनी रविवारी टि्वटरच्या माध्यमातून केला. उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ असतानाही महाराष्ट्रापासून आणखी एक प्रकल्प हिरावून घेण्यात आला आहे. याबद्दल सत्ताधाऱ्यांना माहिती आहे का, असा प्रश्न करत राज्य सरकारच्या क्षमतेवरच त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांच्या पत्राचा दाखला देत आदित्य ठाकरे यांनी मेडिकल डिवाइस पार्क योजना महाराष्ट्राबाहेर गेल्याचे म्हटले आहे. शिवसेना खा. प्रियांका चतुर्वेदी यांनी राज्यसभेत विशेष उल्लेखाद्वारे या पार्कसाठी महाराष्ट्राला निधी उपलब्ध करून देण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याला केंद्रीय मंत्र्यांकडून १४ सप्टेंबर रोजी अधिकृत उत्तर देण्यात आले. वैद्यकीय उपकरणांचा निर्मिती खर्च कमी करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने सदर पार्क योजनेची घोषणा केली. त्यासाठी संबंधित राज्याला केंद्र सरकारकडून शंभर कोटींचे अर्थसाहाय्य करण्यात येणार आहे. महाराष्ट्रासह देशभरातील १६ राज्यांनी डिवाइस पार्कसाठी प्रस्ताव पाठविले होते. त्यापैकी उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश आणि तमिळनाडू या चार राज्यांचे प्रस्ताव स्वीकारण्यात आले असून प्रत्येकी तीस कोटींचा पहिला हफ्ताही वितरित करण्यात आल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी खा. चतुर्वेदी यांना पाठविलेल्या उत्तरात म्हटले आहे. याच उत्तराची प्रत टि्वटरवर उघड करत आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

केवळ केंद्र सरकारच्या दबावामुळे वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला. पण हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याचे समर्थन करताना भाजपला लाज वाटली पाहिजे. मुंबई बंदर आणि जेएनपीटी बंदरात मालाची चढउतार का होत नाही? सर्व मालवाहतूक अदानी बंदरातून का होते? देशात सर्वोकृष्ट बंदर असलेल्या मुंबई बंदराचा विकास जाणीवपूर्वक थांबविण्यात आला आहे.
- अरविंद सावंत, खासदार, शिवसेना