BMC
BMC Tendernama
टेंडर न्यूज

सुशोभीकरणाच्या ३० कोटींच्या टेंडरमध्ये घोटाळा; ठेकेदारास पायघड्या?

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेच्या भायखळ येथील सुशोभीकरण प्रकल्पाच्या टेंडरमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. १६ प्रकारच्या सर्व कामांसाठी वेगवेगळी टेंडर न काढता एका विशिष्ट कंत्राटदाराला काम देण्यासाठी एकच टेंडर मागवण्यात आले आहे, असा आरोप शिवसेनेने केला आहे. तसेच विशिष्ट कंत्राटदाराला काम देता यावे याकरीता विशिष्ट अटी घालण्यात आल्याचाही आरोप आहे. भायखळा येथील माजी नगरसेवक व शिवसेना उपनेते मनोज जामसूतकर यांनी याप्रकरणी महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करून टेंडर रद्द करण्याची मागणी केली आहे.

मुंबईची प्रतिमा उंचावण्यासाठी महानगरपालिकेने संपूर्ण महानगराच्या सौंदर्यीकरणाचा प्रकल्प हाती घेतला असला तरी या प्रकल्पाला अद्याप सुरुवात झालेली नाही. या प्रकल्पातील सुशोभिकरणाची कामे अद्याप टेंडर स्तरावर आहेत. त्यातच अनेक विभागांची टेंडर वादात सापडल्यामुळे रिटेंडर काढण्याची वेळ आली आहे. यापूर्वी मालाड, अंधेरी, वडाळा येथील सुशोभीकरणाच्या कामांची टेंडर रद्द करण्यात आली आहेत. त्यातच बोरिवली, कांदिवली, दहिसर येथील कामांची टेंडर प्रक्रियाही वादात सापडली होती. त्यापाठोपाठ आता भायखळा परिसराचा समावेश असलेल्या ई विभागाची टेंडर प्रक्रियाही वादात सापडली आहे.

या प्रकल्पांतर्गत वाहतूक बेटाचे सुशोभीकरण, पुलाखालील जागा सुशोभीत करणे, पदपथाचे काँक्रिटीकरण, रस्त्यावरील दिवे, भिंतीची रंगरंगोटी अशी १६ प्रकारची कामे केली जाणार आहेत. त्याकरीता प्रत्येक विभागाला ३० कोटी रुपये निधी दिला जाणार आहे. मात्र या सर्व कामांसाठी स्वतंत्र टेंडर काढण्याचा नियम असताना त्यासाठी एकच टेंडर ई विभागाने मागवली आहे. त्यास जामसूतकर यांनी आक्षेप घेतला आहे. अशाच पद्धतीने इतर विभागातही टेंडर काढली जात असतील तर त्याची चौकशी करावी व अशी टेंडर रद्द करावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

भायखळा येथील माजी नगरसेवक व शिवसेना उपनेते मनोज जामसूतकर यांनी याप्रकरणी महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या परिपत्रकाचे उल्लंघन केल्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी व हे टेंडर रद्द करावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. सोळा कामांसाठी एकच टेंडर मागवण्याकरीता महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर कोणी दबाव टाकत आहे, असा सवाल जामसूतकर यांनी केला. कोणा एका विशिष्ट कंत्राटदाराला काम देता यावे याकरीता विशिष्ट अटी घालण्यात आल्या असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. भायखळा विभागात माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांचे वर्चस्व असून जामसूतकर यांनी जाधव यांचे नाव न घेता यापूर्वी भायखळा विभागात कशाप्रकारे स्पर्धेतील कंत्राटदारांवर दबाव टाकला जात होता त्याचे उदाहरण दिले.