मुंबई (Mumbai) : पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर प्रकल्पाचे तब्बल 67% काम पूर्णत्वास आले आहे. सुमारे 2,782 कोटी रुपये खर्च करुन हे काम केले जात आहे. नवी मुंबईतील रायगड जिल्ह्याचे क्षेत्र कर्जतला जोडणे आणि मुंबई महानगर प्रदेश, एमएमआरचा विस्तार करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. तसेच त्यामुळे पनवेल आणि कर्जत दरम्यान नवीन कॉरिडॉरसह मुंबई लोकलला शेवटपर्यंत कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.
पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर प्रकल्प मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (MRVC) साकारत आहे. मुंबई शहरी वाहतूक प्रकल्पाचा (MUTP-III) हा भाग आहे. प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या 56.82 हेक्टर खाजगी जमीन आणि 4.4 हेक्टर सरकारी जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे. वनजमिनीसाठी आवश्यक परवानगी (टप्पा-I मंजुरी) मिळाली आहे आणि उर्वरित प्रक्रिया जलद गतीने सुरू आहे.
सध्या प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. मार्गिकेवर 20 लाख घनमीटर मातीचा भराव करण्यात आला आहे. तिन्ही बोगद्यांचे खोदकाम पूर्ण झाले असून अस्तरीकरणाचे काम सुरू आहे. 47 पुलांपैकी 35 (29 लहान आणि 6 मोठे) पूर्ण झाले आहेत. 4 ठिकाणी रोड ओव्हर ब्रिज बांधण्यात आलेले आहेत आणि मोहोपे आणि किरवली सारख्या महत्वाच्या ठिकाणी काम वेगाने चालू आहे. पुणे एक्सप्रेस वे अंडरपासचे काम पूर्ण झाले आहे. पनवेल, चिखले, मोहपे, चौक आणि कर्जत स्थानकांच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. प्लॅटफॉर्म, फूट ओव्हरब्रिज आणि प्रशासकीय इमारती यांसारख्या सुविधांचे कामही प्रगतीपथावर आहे.
नवी मुंबईतील रायगड जिल्ह्याचे क्षेत्र कर्जतला जोडणे आणि एमएमआरचा विस्तार करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. यामुळे पनवेल आणि कर्जत दरम्यानच्या नवीन कॉरिडॉरसह मुंबई लोकलला शेवटपर्यंत कनेक्टिव्हिटी मिळेल. मालवाहू गाड्यांव्यतिरिक्त, काही लांब पल्ल्याच्या प्रवासी गाड्या सध्याच्या पनवेल, खालापूर आणि कर्जत या कॉरिडॉरवर धावतात. नवीन कॉरिडॉरमध्ये पनवेल, चिकले, महापे, चौक आणि कर्जत अशी पाच स्थानके असतील. डिसेंबर 2016 मध्ये या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती, तर डिसेंबर 2025 पर्यंत हा प्रकल्प पूर्णत्वास जाईल असे अपेक्षित आहे.