Mumbai-Goa Highway
Mumbai-Goa Highway Tendernama
टेंडर न्यूज

मुंबई-गोवा महामार्गाची पहिल्याच पावसात दाणादाण; कुठे भेगा, कुठे...

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : कोकणातील मुंबई-गोवा महामार्गाचे (Mumbai-Goa Highway) चौपदरीकरणाचे काम कित्येक वर्षे रखडले आहे. डिसेंबर 2022 पर्यंत काम पूर्ण होईल, असे रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी जाहीर केल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि ठेकेदारांनी दिवसरात्र काम चालू ठेवून कामाला गती दिली. पण घाईगडबडीत केलेल्या कामांमुळे काही ठिकाणी रस्ता खचला आहे. तर काही ठिकाणी रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

मुंबई गोवा महामार्गावर होणाऱ्या भीषण अपघातांना आळा घालण्यासाठी करोडो रुपयांचा निधी खर्च करून महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. कोकणात मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसाचा विचार करून रस्त्याचे काम करणार्या ठेकेदार कंपन्यांनी कामाचा दर्जा राखायला हवा होता. मात्र विशेष करून खेड आणि चिपळूणमध्ये काम करण्यात ठेकेदार कंपन्यांनी घाई-गडबडीत चौपदरीकरणाचे काम केल्याने पहिल्याच पावसात चौपदरीकरणाचा बँड वाजला आहे.

चिपळूण तालुक्यातील कामथे घाटातील काम सुरू असताना तेथील ग्रामस्थांनी कामाच्या दर्जावर प्रशचिन्ह उपस्थित केले होते. चौपदरीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या वाळूमध्ये माती मिक्स केली जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. ठेकेदार कंपनीला हे काम थांबिण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंतीही यंत्रणेला करण्यात आली होती. मात्र, ग्रामस्थांच्या मागणीकडे यंत्रणेने दुर्लक्ष केले आणि त्याचे परिणाम पहिल्याच पावसात दिसून येत आहेत. पहिल्याच पावसात या घाटातील रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडल्या आणि हा घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद करावा लागला.

खेड तालुक्यात देखील कामाचा दर्जा फारसा वेगळा नाही. कशेडी पायथा ते परशुराम घाट या दरम्यानच्या 44 किलोमीटरच्या रस्त्याला कुठेही लेव्हल नाही. ज्या ठिकाणी मोऱ्या टाकण्यात आल्या आहेत त्या ठिकाणी वाहने इतकी जोरात आदळत आहेत की अपघात होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी रस्ता खचला आहे तर काही ठिकाणी रस्त्याला भेगा पडल्या आहेत.

दाभीळ फाटा येथील उड्डाण पुलाची अवस्था दयनीय आहे. एक दोन ठिकाणी रस्ता खचला आहे तर पुलावर ठिकठिकाणी भेगा देखील पडल्या आहेत. या पुलावरून वाहन चालविणे म्हणजे अपघातांना आमंत्रण देण्यासारखे आहे. मात्र इलाज नसल्याने वाहन चालकांना जीव मुठीत धरून दाभीळ पुलावरून प्रवास करावा लागतो आहे.

ठेकेदार कंपन्यांनी कामाचा दर्जा न राखल्याने पहिल्याच पावसात काँक्रिटीकरण झालेला रस्ता ठिकठिकाणी खचला आहे. महामार्ग चौपदरीकरणाची ही दुरावस्था पाहता रस्त्याच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.