Jitendra Awhad
Jitendra Awhad Tendernama
टेंडर न्यूज

आता 'गाव तिथे म्हाडा'; जितेंद्र आव्हाडांची मोठी घोषणा...

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबईतील कामाठीपुरा (Kamathipura) या सगळ्यात जास्त जुन्या भागाचा पुनर्विकास येत्या तीन महिन्यांत सुरू करण्यात येईल, त्यात ९५४ इमारतींची पुनर्बांधणी करून ८३४४ भाडेकरूंना त्यात सामावून घेतले जाईल, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नुकतीच विधानसभेत केली. राज्यातही तालुका आणि गाव तिथे म्हाडा अशी संकल्पना राबवून पहिला प्रकल्प अहमदनगरजवळील नेवासा इथे उभारण्यात येईल, असे ही त्यांनी सांगितले. मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास, झोपडपट्टी पुनर्विकास, म्हाडाच्या विविध वसाहतींमधील समस्या आदी विषयांवर गेले दोन दिवस झालेल्या चर्चेला ते उत्तर देत होते.

झोपडपट्टी पुनर्विकास योजनेत गेल्या वीस महिन्यांत ९१ नव्या योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला सुरुवात झाली आहे, पुढील सहा ते सात वर्षांत ते पूर्ण केले जाईल, असेही आव्हाड यांनी सांगितले. बीडीडीच्या वरळीनगराला बाळासाहेब ठाकरे नगर, नायगावला शरद पवार नगर आणि ना. म. जोशी मार्ग इथे राजीव गांधी नगर, अशी नावे देण्यात येतील. पत्रा चाळ यापुढे सिद्धार्थ नगर या नावाने ओळखली जाईल, असे त्यांनी सांगितले.

३२ कोटी खर्चून ९२८ महिलांसाठी वसतिगृह
रायगडच्या तळीये इथे ६०० फुटांची घरे बांधून देत असून, त्यांचा ताबा येत्या जूनपूर्वी दिला जाईल, असे आव्हाड यांनी सांगितले. मुंबईत जिजामाता नगर इथे १९ मजली इमारत मुंबई बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृह म्हणून, ताडदेव इथे ३२ कोटी खर्चून ९२८ कामावर जाणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह, वांद्रे येथे लिलावती रुग्णालयाजवळ पशुवैद्यकीय रुग्णालय, पालघरमध्ये २० एकर जागेवर वृद्धांसाठी घरकुल योजना आखण्यात येत आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले.