Narendra Modi
Narendra Modi Tendernama
टेंडर न्यूज

Budget: 2047 पर्यंत समृद्ध भारत बनविणार असे का म्हणाले मोदी?

टेंडरनामा ब्युरो

नवी दिल्ली (New Delhi) : रस्ते, रेल्वे, हवाई मार्ग, जलमार्ग या पायाभूत सुविधांमध्ये (Infrastructure Projects) नवे तंत्रज्ञान आणले जाणार असून पायाभूत सुविधांसाठी १० लाख कोटी रुपयांची अभूतपूर्व गुंतवणूक तरुणांना रोजगार (Employment) देणारी आणि देशाच्या विकासाला गती देणारी असेल, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी व्यक्त केली.

सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग क्षेत्रासाठी अतिरिक्त कर्जाची व्यवस्था करण्यात आली आहे. संकल्प आणि साहस यामध्ये देशाचा मध्यमवर्ग ही मोठी शक्ती असून मध्यमवर्गाला सशक्त बनविण्यासाठी करात मोठी सवलत दिली आहे. देशाच्या विकासाला गती देणारा अर्थसंकल्प अभिनंदनीय असून याआधारे २०४७ पर्यंत समृद्ध भारत बनविण्यासाठी सर्वांनी संकल्प घ्यावा, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले.

हरित तंत्रज्ञान, हरित अर्थव्यवस्था, हरित रोजगार याला प्रोत्साहन देणाऱ्या या अर्थसंकल्पामध्ये नव्या तंत्रज्ञानावर बजेटमध्ये भर देण्यात आला असल्याचे त्यांनी नमूद केले.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा अमृत काळात सादर झालेला पहिला अर्थसंकल्प वंचितांना प्राधान्य देणारा तसेच शेतकरी, मध्यमवर्गांसह सर्वांचे स्वप्न पूर्ण करणारा आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या अर्थसंकल्पाची प्रशंसा केली.

संसदेमध्ये मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिक्रिया व्यक्त करताना ग्रामीण, शहरी क्षेत्र, महिला, कृषी क्षेत्र, उद्योग क्षेत्रासाठीच्या योजनांचा उल्लेख करताना देशासाठी मध्यम वर्ग एक शक्ती असून मध्यमवर्गीयांसाठी करात मोठी सवलत देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

मोदी म्हणाले, की पारंपरिक पद्धतीने हस्तकलेतून सृजन करणारे विश्वकर्मा या देशाचे निर्माते आहेत. देशाच्या अर्थसंकल्पात पहिल्यांदाच त्यांच्यासाठी प्रशिक्षण, तंत्रज्ञान, पतपुरवठा आणि बाजारापर्यंत पोहोचणे यासाठी पीएम विकास योजना आणली. शहरी, ग्रामीण महिलांसाठी सरकारने अनेक पावले उचलली. जलजीवन मिशन, पीएम आवास योजना आहेत. या सर्वांसाठी महिला बचत गटांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष बचत योजना सुरू केली जात आहे. जनधन खात्यांसोबतच ही बचत योजना महिलांना ताकद देणारी आहे.

सरकारने सहकार क्षेत्रात जगातील सर्वात मोठी अन्नधान्य साठवण योजना आणली असून नव्या सहकारी संस्था तयार करण्यासाठी महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. आर्थिक देवाणघेवाणीसाठीच्या डिजिटल तंत्रज्ञानाच्या यशाची कृषी क्षेत्रात पुनरावृत्ती केली जाणार असून यासाठी डिजिटल कृषी पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी योजना अर्थसंकल्पात आणल्याचे पंतप्रधान म्हणाले.

आंतरराष्ट्रीय मिलेट वर्षाचा फायदा भारतातील लहान शेतकऱ्यांना मिळेल. या विशेष धान्याला आता "श्री अन्न" ही नवी ओळख देण्यात आली आहे. यामुळे लहान शेतकऱ्यांना आर्थिक लाभ तर नागरिकांना निरोगीपणाचा लाभ मिळेल, असेही मोदी म्हणाले.