Nirmala Sitharaman
Nirmala Sitharaman Tendernama
टेंडर न्यूज

Budget 2024 : महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांना मोठा बूस्टर 15 हजार कोटींची तरतूद

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : देशाच्या अंतरिम अर्थसंकल्पात राज्यातील रेल्वे प्रकल्पांसाठी १५ हजार ५५४ कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. तर मध्य रेल्वेला यंदा १० हजार ६११ कोटी रुपयांचा भरीव निधी देण्यात आला आहे. तसेच पश्चिम रेल्वेला सुद्धा १८ हजार ९३ कोटी रुपयाचा भरीव निधी मंजुर केला आहे. त्यामुळे राज्यातील रेल्वे प्रकल्पांना गती मिळणार आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प गुरुवारी सादर केला आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पासाठी भरीव तरतूद करण्यात आली. या अंतरिम अर्थसंकल्पानंतर पत्रकार परिषदेत घेत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, या अर्थसंकल्पात रेल्वेचे २ लाख ५२ हजार कोटी रुपयांचे बजेट आहे. २००९ ते २०२४ पर्यंत महाराष्ट्राच्या रेल्वे प्रकल्पासाठी ११७१ कोटी रुपयांची तरतूद होती. मात्र यावेळी महाराष्ट्राला रेल्वेसाठी १५ हजार ५५४ कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. काँग्रेस सरकारच्या काळात काम संथ गतीने होते. अनेक प्रकल्प रखडले होते पण आता शिंदे सरकार येताच राज्यातील रेल्वे प्रकल्पाला गती मिळाली आहे. अमृत स्टेशन योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांचे पुनरुज्जीवन केले जात आहे. महाराष्ट्रात रेल्वेचे ९८ टक्के विद्युतीकरण पूर्ण झाल्याची माहितीही रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

मध्य रेल्वेला १० हजार ६११ कोटी -
मध्य रेल्वेला यंदा १० हजार ६११ कोटी रुपयांचा भरीव निधी देण्यात आला आहे. गेल्या वर्षी २०२३-२४ मध्ये १० हजार ६०० कोटी रुपये निधी दिला होता. ट्रॅकची दुरुस्ती १ हजार २२ कोटी, पूल-बोगदा- १ हजार ३२० कोटी, सिग्नल यंत्रणा १८३ कोटी, विद्युतीकरण प्रकल्पासाठी ३३८ कोटींची तरतूद केली आहे.

पश्चिम रेल्वेला १८ हजार ९३ कोटी -
यंदाच्या अर्थसंकल्पात पश्चिम रेल्वेला १८ हजार ९३ कोटी रुपयाचा निधी मंजुर केला आहे. गेल्या वर्षी १४ हजार ३३५ कोटी रुपये दिले होते. यात नवीन रेल्वे लाईन, दुहेरीकरणाकरिता ५ हजार १५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. रोड ओव्हर पुलाकरिता १ हजार १९६ कोटी, प्रवासी सुविधांसाठी १ हजार १३५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. मुंबई-दिल्ली मार्गावर गाड्यांचा वेग प्रति तास १६० ते २०० किलोमीटर वाढविण्यासाठी २ हजार ६६२ कोटी रुपये मंजुर केले आहेत.

नवीन रेल्वे लाईन-
अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ २५०किमी- २७५ कोटी

वर्धा-नांदेड (व्हाया यवतमाळ-पुसद) २७०किमी- ७५०कोटी

बारामती-लोणंद ५४ किमी- ३३० कोटी

धुळे - नंदुरबार ५० किमी- १००कोटी

सोलापूर-उस्मानाबाद व्हाया तुळजापुर ८४ किमी- २२५कोटी

कल्याण- मुरबाड व्हाया उल्हासनगर २८ किमी - १० कोटी

*****

रेल्वे मार्गिकेचे दुहेरीकरण एकूण - १६१५ कोटी

कल्याण-कसारा तिसरी रेल्वे लाईन - ६८ किमी १२५ कोटी

वर्धा-बल्लारशहा ३ री लाईन - १३२ किमी - २०० कोटी

इटासरी-नागपुर २८० किमी - ३२० कोटी

पुणे-मिरज-लोढा दुहेरीकरण ४६७ किमी - २०० कोटी

दौंड-मनमाड दुहेरीकरण २४७ किमी - ३०० कोटी

वर्धा - नागपूर चौथी लाईन ७९ किमी १२० कोटी

जळगाव-भुसावळ चौथी लाईन - २४ किमी - ४० कोटी

मनमाड-जळगाव तिसरी लाईन - १६०किमी-१२०  कोटी

*****
वाहतुक सुविधा

पनवेल-कळंबोली कोचिंग टर्मिनल- १० कोटी

सीएसएमटी स्थानकातील प्लॅटफार्म क्रमांक १० ते १३ ची लांबी वाढविणे- १० कोटी

एलटीटी टर्मिनस --५ कोटी

*****
पादचारी पूल-रोड ओव्हर पूल-

विक्रोळी रोड ओव्हर पूल-५ कोटी

दिवा रोड ओव्हर पूल-५ कोटी

दिवा-वसई रोड ओव्हर पूल--९ कोटी

दिवा-पनवेल रो़ड ओव्हर पूल--३ कोटी

कल्याण-इगतपुरी रो़ड ओव्हर पूल--१६.१ कोटी