Eknath Shinde
Eknath Shinde Tendernama
टेंडर न्यूज

एकनाथ शिंदेंच्या बंडाचा सृमद्धी महामार्गाला फटका?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : नागपूर ते मुंबई दरम्यानचा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग (Balasaheb Thackeray Maharashtra Samruddhi Mahamarg) पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाचा मुहूर्तही ठरला होता. मात्र, तो अचानक पुढे ढकलण्यात आला होता. आता राज्य सरकार अडचणीत आल्याने त्याचा समृद्धी महामार्गाच्या प्रगतीवर परिणाम होणार का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडेच समृद्धीची जबाबदारी होती. त्यांनीच बंडाचे निशाण उभारल्याने त्याचा 'समृद्धी'च्या कामावर काय आणि किती परिणाम होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

या संपूर्ण समृद्धी महामार्गाचे काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मात्र, शिवसेनेतील बंड आणि त्यामुळे अडचणीत आलेले राज्य सरकार, या घडामोडींचा समृद्धी महामार्गाच्या कामावर परिणाम झाल्यास राज्यातील एका मोठ्या आणि महत्त्वाच्या प्रकल्पाचे काम आणखी रखडले जाऊ शकते.

राज्यातील सत्ताधारी आघाडीतील सर्वांत मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेतच मोठी बंडाळी झाली असून, या सर्व घटनाक्रमाचे नेतृत्व खुद्ध एकनाथ शिंदे हेच करत आहेत. त्याचा परिणाम शिंदे यांच्याकडे जबाबदारी असलेल्या मंत्रालयाच्या कामावर होऊ शकतो, अशी शक्यता वर्तविली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाचा मुहूर्त आणखी पुढे जाऊ शकतो.

या द्रुतगती मार्गाचा विस्तार नागपूरपासून गोंदिया, गडचिरोलीपर्यंत करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनीच काही दिवसांपूर्वीच विधानसभेत दिली होती. या महामार्गाच्या नागपूर ते सेलू बाजार या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण २ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते केले जाणार होते. तशी घोषणाही शिंदे यांनीच केली होती. मात्र, अखेरच्या क्षणी काही तांत्रिक कारणे देत हा कार्यक्रम रद्द झाला होता. राज्यासाठी महत्त्वाच्या या द्रुतगती मार्गेचे उद्धाटन कधी होणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

पहिल्या टप्प्याचा मुहूर्तही हुकला

नागपूर ते सेलूबाजार या पहिल्या टप्यात वन्यजीव उन्नत मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. या उन्नत मार्गाचे सुपर स्ट्रक्चर हे आर्च पद्धतीचे आहे. हे काम ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. हे काम अंतिम टप्प्यात असताना त्यातील १०५ पैकी काही आर्च स्ट्रीप्सना अपघातात हानी पोहोचली आहे. तज्ज्ञांसोबत पाहणी आणि चर्चा करून नवीन पद्धतीचे सुपर स्ट्रक्चर बनवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी दीड महिन्यांचा कालावधी लागू शकतो असे सांगण्यात आले होते.

वन्यजीव उन्नत मार्ग पूर्ण झाल्याशिवाय महामार्ग वाहतुकीसाठी खुला करता येणार नाही. त्यामुळे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते सेलूबाजार या पहिल्या टप्याचे लोकार्पण पुढे ढकलण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सांगण्यात आले होते.