Water Tunnel
Water Tunnel Tendernama
टेंडर न्यूज

खडकवासला ते फुरसुंगी बोगद्यातून पाणी; डीपीआरचे काम अंतिम टप्प्यात

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : खडकवासला धरण ते फुरसुंगी दरम्यान बोगद्यातून पाणी नेण्याच्या प्रकल्पासाठी आवश्‍यक असलेले माती परिक्षणाचे काम पूर्ण झाले असून, प्रकल्प अहवाल तयार (डीपीआर) करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच हा प्रकल्प अहवाल राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

खडकवासला धरणातून कालव्यात सोडले जाणाऱ्या पाण्याचे बाष्पीभवन, गळती, चोरी आदी कारणांमुळे सुमारे अडीच टीएमसी पाणी वाया जाते. शिवाय कालव्यात पडणाऱ्या कचऱ्यामुळे पाणी प्रदूषित होते. यापार्श्‍वभूमीवर खडकवासला धरण ते फुरसुंगी दरम्यान २५ किलोमीटर लांबीच्या बोगद्यामधून पाणी नेण्याची योजना आखण्यात आली आहे. हा प्रकल्प राबविल्यास अडीच टीएमसी पाणी वाचणार असून हे जादा पाणी शहरासाठी तसेच ग्रामीण भागाला शेतीसाठी देणे शक्‍य होणार आहे.

या योजनेला चालना देण्याचा निर्णय तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने घेतला आला. त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या होत्या. त्यानुसार निविदा मागवून एका खासगी कंपनीला हे काम देण्यात आले आहे. ज्या मार्गाने बोगदा जाणार आहे, त्या मार्गावरील मृद तपासणी करण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यासाठी प्रत्येक अर्धा किलोमीटर अंतरावर बोअर खोदण्याचे काम हाती घेण्यात आले होते. आता पुढच्या टप्प्यात या प्रकल्पाचे डिझाईन (आराखडा) आणि इस्टिमेट तयार करण्याचे काम सुरु आहे. लवकरच सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून तो मान्यतेसाठी जलसंपदा विभागाकडून सरकारकडे पाठविला जाणार असल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर अधिकाऱ्यांनी सांगितले.

दीड हजार कोटींचा खर्च
खडकवासला ते फुरसुंगी दरम्यान ७.८० मीटर रुंद, ३.९० मीटर उंच आणि १.९५० मीटर गोलाकार उंची अशा डी आकाराच्या बोगद्यातून बोगद्यातून पाणी नेण्याचा प्राथमिक आराखडा निश्‍चित करण्यात आला आहे. या बोगद्यामुळे कालव्याची क्षमता १ हजार ५१० क्‍युसेक्‍स होणार असून ते सर्व पाणी गुरुत्वाकर्षण शक्तीने फुरसुंगीपर्यंत नेण्यात येणार आहे. २५ किलोमीटर लांबीच्या बोगद्यातून पाणी नेण्याच्या कामासाठी सुमारे दीड हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. बोगद्यातून पाणी नेणे हा प्रकल्प आर्थिकदृष्टया व्यवहार्य असल्याचे जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.