Mumbai
Mumbai Tendernama
टेंडर न्यूज

ठाणे-नवी मुंबईला जोडणाऱ्या 'ऐरोली-काटईनाका'च्या खर्चात दुपटीने वाढ

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबईसह ठाणे (Thane) व नवी मुंबई (Navi Mumbai) या शहरांना कल्याण- डोंबिवलीसह भिवंडी आणि अंबरनाथ- बदलापूर या शहरांना जोडणाऱ्या ऐरोली-काटई मार्गाचा खर्च अलीकडे २६९ कोटींनी वाढला आहे. याअंतर्गत ठाणे-बेलापूर रस्ता ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार दरम्यान येणाऱ्या बोगद्याच्या सुधारित कामाचा खर्च १५० कोटी ४५ लाखांनी वाढला आहे. तर मुलुंड- ऐरोली खाडीपूल ते ठाणे-बेलापूर रस्त्यांपर्यंतच्या उन्नत मार्गाचा खर्च ११८ कोटी ६४ लाखांनी वाढला आहे.

ऐरोली ते काटईनाका हा मार्ग एकूण १२.३ किमीचा आहे. २०१४ मध्ये ७१७ कोटी ३६ लाखात होणाऱ्या या मार्गाच्या खर्चात गेल्या ८ वर्षात दुप्पट वाढ झाली असून नव्याने १४३९ कोटी ३९ लाख रुपयांच्या खर्चाला एमएमआरडीएने सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. या रस्त्याची विभागणी तीन टप्प्यांत केली आहे. यातील पहिला टप्पा ठाणे-बेलापूर ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार हा साडेतीन किमी लांबीचा रस्ता रॅम्पसहीत बांधकामासाठी १४४ कोटी ४७ लाखांचे एल १ टेंडर मंजूर २०१८ मध्ये मंजूर करण्यात आले. तर रस्ता आणि पारसिक डोंगरातून जाणाऱ्या बोगद्याच्या बांधकामासाठी आयव्हीआरसी आणि एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर यांचे २३७ कोटी ५५ लाख ५१ हजार ७८७ रुपयांचे टेंडर मंजूर करण्यात आले. विहीत मुदतीत हे काम पूर्ण न झाल्याने ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

बोगद्याच्या ऐरोली बाजूकडील डोंगरावर २.१ मीटर ओव्हरबर्डन आहे. तसेच बोगद्यात ५० मीटरपर्यंत माती कोसळण्याची भीती आहे. यामुळे ती काढावी लागली. यात डोंगरदऱ्यातील खोदकामाचा खर्च ११८ कोटी ८८ लाख, बोगद्यात ३२ मीटर क्षेत्रात रॉकबोल्ट बसविणे ३१ कोटी ९८ लाख आणि वस्तू व सेवा कर सहा कोटी ५९ लाख, असा १५० कोटी ४५ एकूण खर्च वाढला आहे. रेल्वे आणि उच्चदाब वाहिन्यांमुळे वाढला उन्नत मार्गाचा खर्च या मार्गात २.५७ किमीचा उन्नत मार्ग आहे. तो बांधण्यासाठी ५ सप्टेंबर २०१८ रोजी २७५ कोटी ९० लाखांचे टेंडर मंजूर करण्यात आले. मात्र, वनविभागाची परवानगी आणि सिडकोकडून जमिनीचा ताबा उशिरा मिळाला. यात अनेक अडचणी आल्या. रेल्वेकडून सबस्टेशनचे स्थलांतरण उशिराने झाले. तसेच २२ केव्ही आणि ४०० उच्चदाबवाहिन्या काढून त्यांचे स्थलांतरण करणे यामुळे खर्च वाढला. शिवाय पिण्याची पाण्याची ९०० मिमी व ६०० मिमी व्यासाची पर्जन्यवाहिनीचे स्थलांतर करावे लागले. हा प्रकल्प ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरून जातो. यामुळे त्या भागात स्टेनलेस स्टीलचा वापर करावा लागला. यात उच्चदाब वाहिन्यांचे स्थलांतर करणे ५९ कोटी १३ लाख, सेवा वाहिन्यांचे स्थलांतर १५ कोटी ३१ लाख, रेल्वेपुलासाठी स्टेनलेस स्टीलचा वापर साडेतीन कोटी, फाउंडेशन व पीअर खर्च २६ कोटी, मास्टिक रस्ता चार कोटी आणि वस्तू व सेवा कर १० कोटी ७० लाख असा एकूण ११८ कोटी ६४ लाखांचा खर्च वाढला.

कोविड महामारीसह वनविभागाची मंजुरी, भूसंपादन, बोगद्याच्या कामात होणारे ब्लास्टिंग, त्यातून उद्भवणाऱ्या समस्या आणि उच्चदाब वाहिन्यांचे स्थलांतर यामुळे हा खर्च वाढला असल्याचे स्पष्टीकरण एमएमआरडीएने वाढीव खर्चास मंजुरी देताना दिले आहे. ऐरोली-काटईनाका मार्गाच्या संरेखनात बदल झाल्याने काही घटकांचा नव्याने समावेश करण्यात आल्याने या मार्गाच्या खर्चासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता घेण्यात आली. यापूर्वी १३४ व्या बैठकीत २०१४ मध्ये ७१७ कोटी ३६ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता घेतली होती. मात्र, या खर्चात दुप्पट वाढ झाली असून नव्याने १४३९ कोटी ३९ लाख रुपयांच्या खर्चाला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली.