wardha
wardha Tendernama
विदर्भ

Wardha : वर्ध्यात होणार 300 वनराई बंधारे; खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनीच केले श्रमदान

टेंडरनामा ब्युरो

वर्धा (Wardha) : पाणी अडवा, पाणी जिरवा या संकल्पनेतून कारंजा तालुक्यात 300 वनराई बंधारे तयार करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. श्रमदानातून वनराई बंधारे निर्माण करणे ही एक लोकचळवळ व्हावी, या हेतूने खुद्द जिल्हाधिकारी राहुल कर्डिले (Rahul Kardile) यांनी श्रमदान केले. त्यांनी चोपण येथे उपक्रमाच्या श्रीगणेशा प्रसंगी वनराई बंधाऱ्यासाठी श्रमदान करून नागरिकांनीही या उपक्रमात स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवत हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहन केले.

निती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमात कारंजा तालुक्याचा समावेश आहे. या कार्यक्रमांतर्गत पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेतून कारंजा तालुक्यात 300 वनराई बंधारे तयार केले जात आहेत. वनराई बंधारे तयार करण्याच्या कामाचा शुभारंभ चोपण येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते झाला. त्यानंतर ब्राह्मणवाडा व येणगाव येथेही श्रमदानातून वनराई बंधारे तयार करण्यात आले. 

याप्रसंगी आर्वीचे उपविभागीय महसूल अधिकारी विशाल शिरसाट, कारंजा तहसीलदार ऐश्वर्या गिरी, गटविकास अधिकारी प्रवीण देशमुख, तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख, कृषी अधिकारी मंगेश पंधरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. गारपीट येथे जनसंवाद कार्यक्रमात लाभार्थीना 5 टक्के दिव्यांग कल्याण निधीचे धनादेश जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

वनराई बंधायांच्या माध्यमातून रब्बी पिकांकरिता संरक्षित ओलीत, भू- गर्भातील पाणी पातळीत वाढ, तसेच जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे. वनराई बंधारे मनुष्यांसह जनावरांसाठीही फायद्याचे आहेत. गावकऱ्यांनी लोकसहभागातून अशाच प्रकारे सर्व गावांत वनराई बंधारे निर्माण करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी मनोगत व्यक्त करताना केले.