NCI Nagpur
NCI Nagpur Tendernama
विदर्भ

Nitin Gadkari : जागतिक दर्जाचा 'हा' प्रकल्प नागपूरची शान ठरेल!

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : संशोधनाच्या जोरावरच आपण कॅन्सर सारख्या रोगाला रोखू शकतो. कॅन्सर मुक्त भारतासाठी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट (NCI) ही संस्था महत्त्वाची भूमिका बजावेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या लोकार्पण प्रसंगी केले.

नागपूरातील आऊटर रोड जामठा येथे डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि संशोधन संस्थेद्वारे स्थापित नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या लोकार्पण सोहळ्याला ते संबोधित करत होते. याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामुख्याने उपस्थित  होते.

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट या संस्थेतून कॅन्सर विषयी प्रतिबंधात्मक उपचार त्याचप्रमाणे निदान होईल. जागतिक स्तरावरील अद्यावत तंत्रज्ञानासोबत जॉईंट व्हेंचर करून या संशोधनाद्वारे कॅन्सरच्या उपचारांमध्ये आपल्याला मदत होईल, असे प्रयत्न करायला हवेत, असे आवाहन गडकरी यांनी यावेळी केले. या संस्थेत थॅलेसेमिया आणि सिकलसेल वर अधिक संशोधन आणि उपचार यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. विदर्भातील या आजाराच्या रुग्णांना याचा लाभ होईल. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कार्यकाळात नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाची भेट सर्वसामान्य नागरिकांना दिली. त्याच धर्तीवर एनसीआयची सुद्धा सुविधा आता सामान्य नागरिकांना मिळाली आहे.

जनरल वार्ड सुद्धा एखाद्या पंचतारांकित हॉटेल सारखा

याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयाच्या बांधकामाची प्रशंसा केली. येथील  जनरल वार्ड सुद्धा एखाद्या पंचतारांकित हॉटेल सारखा असून येथे सर्व सुविधा उपलब्ध आहेत असे त्यांनी सांगितले. कॅन्सरसारख्या आजारावर गुणवत्तापूर्ण उपचार उपलब्ध करून देणे हे एक आव्हान असून या सुविधा किफायतशीरपणे उपलब्ध करून देण्यास  शासन प्रयत्नशील  आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजना, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता योजना या योजनांद्वारे सर्वसामान्यांना आधार दिला जात आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कर्करोगासारखा आजार जडल्यास आयुष्यभराची पुंजी द्यावी लागते, परंतु एनसीआय सारख्या संस्थेत किफायतशीर दरात हा उपचार उपलब्ध असून. त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळेल. कर्करोगाच्या हजारो रुग्णांसाठी एनसीआय मधील डॉक्टर्स आणि नर्सेस देवदूत म्हणून काम करतील, अशी आशा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली. 

मुंबईमध्ये टाटा कॅन्सर रुग्णालयात रुग्णांचे सोय होत होते. परंतु या रुग्णालयावर प्रचंड असा ताण पडत होता. मध्य भारतातील कर्करोग रुग्णांची सोय व्हावी यासाठी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटची स्थापना केली असून यामध्ये बालकांसाठी ‘पेडियाट्रीक वॉर्ड’  मध्ये नि:शुल्क उपचार केले जात आहेत. येथे भरती होणारे बालक पूर्णपणे बरे होऊन जातात. कॅन्सरच्या उपचार क्षेत्रातील प्रोटोन बिम, कार्बन आयन थेरेपी सारख्या अत्याधुनिक यंत्रणा किफायतशीर दरात एनसीआय मध्ये उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.

देशाच्या विविध भागातून येणा-या रुग्णांच्या नातेवाईकांच्या राहण्यासाठी धर्मशाळा सुद्धा या ठिकाणी उभारली  जाईल. थॅलसेमिया, सिकलसेल या रक्तासंदर्भातील आजारावर देखील येथे संशोधन होणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि संशोधन संस्थाद्वारे स्थापित नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट या कर्करोगाच्या इस्पितळात 470 खाटांची क्षमता असणारे हे 25 एकर वर पसरलेले हॉस्पिटल प्रामुख्याने कर्करोगावर उपचारासाठी असून, या स्वयंसेवी संस्थेद्वारे हे हॉस्पिटल चालवले जात आहे. 28 फेब्रुवारी 2015 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या संस्थेचे भूमिपूजन करण्यात आले. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन हे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या हस्ते 2017 मध्ये नागपुरातच करण्यात आले होते.

एनसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश जोगळेकर यांनी या इमारती विषयी माहिती देताना सांगितले की ही इमारत दहा मजली असून, 7.5 लाख स्क्वेअर फूट जागेवर पसरलेली आहे. यामध्ये विविध विभाग असून कर्करोगाच्या उपचाराकरीता सर्व सुविधा एकाच छताखाली येथे उपलब्ध आहेत.