नागपूर (Nagpur) : ब्रिटीशकालीन अजनी रेल्वे स्थानकावरील उड्डाणपूल (Ajni Railway Station Flyover) आता आठ पदरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) सुधारित आराखडा सादर केला आहे. या पुलाचे पदर वाढवण्यात येणार असल्याने या उड्डाणपुलावर होणाऱ्या रोजच्या वाहतुकीच्या कोंडीतून नागरिकांची सुटका होणार आहे.
पूर्व आणि पश्चिम नागपूरला जोडणारा हा महत्त्वाचा पूल आहे. तो ब्रिटीशांनी बांधला होता. यापुलाचे आयुष्य संपले आहे. तसे पत्र ब्रिटीशांनी सुमारे २० वर्षांपूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाला पाठवले होते. आयुष्य संपल्याने या पुलाची जबाबदारी आता स्थानिक स्वराज्य संस्थेची राहील, असेही पत्रातून स्पष्ट केले होते. मात्र पंधरा वर्षे महापालिकेने पुलाकडे ढुंकून पाहिले नाही. पुलाच्या भिंतीचा काही भाग खचल्यानंतर महापालिकेला जाग आली. पुलावरील जड वाहनांची वाहतूक रोखण्यात आली. याकरिता लोखंडी खांब मधोमध लावण्यात आले. त्यामुळे वाहतुकीची कोंडी चांगलीच वाढली.
नितीन गडकरी देशभरात पूल बांधतात मात्र आपल्याच शहराकडे दुर्लक्ष करतात अशी ओरड सुरू झाली होती. याची दखल गडकरी यांनी घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले होते. महामार्ग प्राधिकरणाने आठ पदरी पुलाचा आराखडा सादर केला आहे. यावर १७८ कोटी रुपये अपेक्षित खर्च दर्शवला आहे. मात्र आठ पदरीकरणामुळे अतिरिक्त जागा अधिग्रहित करावी लागणार आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला असलेली रेल्वेची १० मीटर जागा, तसेच पुलाच्या पूर्व भागातील २४ दुकाने यामुळे तोडावी लागणार आहेत. हा प्रस्ताव महापालिकेमार्फत राज्य सरकारला पाठवण्यात येणार आहे.
गडकरी यांनी सुरवातील अजनी इंटर मॉडेल प्रकल्पांतर्गत या पुलाचा प्रस्ताव दिला होता. आता हा प्रकल्प रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे एनएचएआय आणि महापालिकेने स्वतंत्रपणे पुलाचा नवा आराखडा तयार केला आहे. पूल जेथे संपतो त्या ठिकाणी चार बाजूने रस्ते एकत्र येतात. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी येथे होते. हे टाळण्यासाठी मध्यभागात मोठा गोलाकार पूल करावा लागणार आहे.