<div class="paragraphs"><p>Nagpur</p></div>

Nagpur

 

Tendernama

विदर्भ

नागपूरचा 'हा' उड्डाणपुल नव्याने बांधणार; ६५० कोटी रुपयांचा खर्च

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : नागपूर महानगरपालिकेच्या (Nagpur Municipal Corporation) हद्दीतील पाचपावली उड्डाण पुलाची दुरवस्था झाली असून, या ठिकाणी नवा उड्डाणपूल बांधणार असल्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी दिले आहे. या पुलाच्या दुरवस्थेबद्दल काँग्रेसचे नाना पटोले (Nana Patole) यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता.

पाचपावली पुलाचा मुद्दा उपस्थित करताना नाना पटोले म्हणाले की, नागपूर शहरातील उत्तर नागपूर व पूर्व नागपूरला जोडणारा पाचपावली उड्डाणपूल हा महत्वाचा आहे. या पुलाच्या ३० पिलर्सपैकी १० खराब स्थितीत आहेत, ते कधीही पडतील अशी स्थिती आहे. पूल धोकादायक आहे, भविष्यात काही धोका होऊ नये याची काळजी घेण्याची गरज आहे. त्यासाठी तातडीने एक बैठक घेऊन नागपूरकर जनतेचे हित लक्षात घेऊन ह्या पुलाचा प्रश्न लवकर निकाली काढावा. या बजेटमध्ये ह्या पुलासाठी काही तरतूद केली आहे का असा प्रश्न विचारला होता.

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण या प्रश्नावर उत्तर देताना म्हणाले की, नागपूर शहरातील पाचपावली उड्डाणपुलाचे १९८८ साली बांधकाम सुरु करून तो १९९२ साली पूर्ण झाला. हा पूल नागपूर महानगरपालिकेकडे हस्तांतरीत केलेला आहे. पुलावरील रहदारी वाढलेली असून पूल मात्र धोकादायक नाही परंतु या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडीट करू. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून हा जुना पूल पाडून नवा पूल बांधणे प्रस्तावित असून बारा मीटरचा नवा पूल बांधला जाणार आहे. दोन वर्षात हे काम पूर्ण होईल व त्यासाठी ६५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे उत्तर दिले.