Amravati
Amravati Tendernama
विदर्भ

Amravati : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे दुर्लक्ष; कोट्यवधींचा खर्च तरीही नळाला...

टेंडरनामा ब्युरो

अमरावती (Amravati) : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर कोट्यवधी रुपये खर्च करून जलशुद्धीकरण केंद्र स्थापन करण्यात आले असले तरी दूषित पाणीपुरवठा आजाराला निमंत्रण देणारा ठरला आहे. काही दिवसांत मोठ्या प्रमाणात शहरात गढूळ, मातीमिश्रित पाणी नागरिकांना नळातून साठवून ठेवावे लागले. दुसरीकडे पुन्हा फेब्रुवारी महिन्यापासून दिवसाआड पाणीपुरवठा होण्याचे संकेत मिळाले आहेत.

विदर्भाचे एकमेव पर्यटनस्थळ

असले तरी पिण्याच्या पाण्यासाठी मागील 15 वर्षांपासून सुरू असलेली बोंब चिखलदऱ्यात कायम आहे. बागलिंगा प्रकल्पातून चिखलदरा पर्यटनस्थळाला होऊ शकणारा पाणीपुरवठा, त्याचे संथ गतीने सुरू असलेले कार्य पाहता यंदा पुन्हा एकदा दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. बोटावर मोजण्याएवढी लोकसंख्या आणि पाणीपुरवठा यंत्रणेवर कोट्यवधी रुपयांचा दरवर्षी होणारा खर्च असला तरी चिखलदरावासीयांसाठी रडीचा डाव सुरूच असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. मंगळवारी नळाचे पाणी पाहता, प्राधिकरणातर्फे जलशुद्धीकरण केंद्राचा खर्च व्यर्थ ठरला का, अशी म्हणायची वेळ आली आहे. हा नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे. अशी प्रतिक्रिया चिखलदरा येथील एका नागरिकाने दिली.

फिल्टर प्लांट स्वच्छतेमुळे गढूळ पाणी :

चिखलदरा शहराला होणारा पाणीपुरवठा हा जलशुद्धीकरण केंद्रावरूनच होतो. फिल्टर प्लांट केला स्वच्छ धुतल्यामुळे थोडेसे गढूळ पाणी नळातून गेले असेल परंतु, नंतर तत्काळ दुसया दिवशी शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जात असल्याचे तेथील कार्यरत कर्मचारी सुनील दुरंग यांनी सांगितले.

पुढच्या महिन्यात होणार दिवसाआड पुरवठा :

चिखलदरा येथे कालापाणी, सक्कर तलाव तसेच आमझरी येथूत सहा किलोमीटर अंतरावरून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, यंदा पावसाने लवकरच दांडी मारल्याने कालापाणी तलाव पूर्ण भरला नाही. परिणामी, नेहमीप्रमाणे फेब्रुवारी महिन्यापासून दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे.

साहेब, तुम्ही हेच पाणी पिता का?

किमान एक किंवा दोन दिवस गढूळ पाणीपुरवठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत केला जातो. नागरिक वारंवार तक्रारी करून थकले आहेत. मंगळवारी तर दूषित व गढूळ पाण्याने कळस गाठला. हे मातीमिश्रित पाणी की चहा, हेच नागरिकांना कळेनासे झाले. साहेब, तुम्ही हेच पाणी पिता का, असा प्रश्न नागरिकांनी प्रशासनप्रमुखांना केला आहे.