Irrigation Scheme
Irrigation Scheme Tendernama
विदर्भ

Amravati : 'हे' मध्यम प्रकल्प कागदोपत्रीच; कधी होतील पूर्ण? किंमत पोहोचली हजार कोटींवर

टेंडरनामा ब्युरो

अमरावती (Amravati) : जिल्ह्यात शहानूर, चंद्रभागा, पूर्णा, सपन, पंढरी, गर्गा व बोडींनाला असे सात मध्यम प्रकल्प आहेत. त्यातील मेळघाटातील गर्गा व चांदूरबाजार तालुक्यातील बोर्डीनाला या प्रकल्पांची निव्वळ कागदावरच नोंद आहे. दोन्ही प्रकल्पांना अद्यापपर्यंत दारे बसविण्यात न आल्याने त्यात पाणी साठू शकले नाही.

गर्गा मध्यम प्रकल्पाची एकूण क्षमता 26.45 दलघमी आहे. तर, बोर्डीनाला प्रकल्पाची क्षमता 12.12 दलघमी आहे. प्रत्यक्षात गर्गा प्रकल्प शून्य तर बोर्डीनाला प्रकल्पात केवळ 3.22 टक्के पाणीसाठा असल्याची नोंद जलसंपदा विभागाने घेतली आहे. दोन्ही प्रकल्प कोरडेठाक असताना कागदोपत्री ते प्रकल्प गोषवाऱ्यात दाखविण्याची गरज तरी काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे गर्गा प्रकल्पाची किंमत 494 कोटी तर बोर्डीनाला प्रकल्पाची किंमत केव्हाच 515 कोटींच्या पुढे गेली आहे. ते प्रकल्प केव्हा सुरू होतील, त्यातून सिंचनक्षमता केव्हा निर्माण होईल, पेयजलाचा पुरवठा सुरू होऊन पाणीटंचाईची समस्या केव्हा मार्गी निघेल, याचे उत्तर जलसंपदा विभागाकडे नाही. दरम्यान, एकमेव मोठ्या अप्पर वर्धा प्रकल्पात 11 एप्रिल अखेर 50.62 टक्के पाणी शिल्लक आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातदेखील पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले आहेत. त्यामुळे मेळघाट व चांदूरबाजार तालुक्याचा सिंचनाचा व पेयजलाचा प्रश्न कायमचा सोडवू शकणाऱ्या गर्गा व बोर्डीनाला प्रकल्पाची रखडगाडी चव्हाट्यावर आली आहे.

लघुप्रकल्प 40 टक्क्यांवर : 

जिल्ह्यातील लघुप्रकल्पांची स्थितीदेखील फारशी चांगली नाही. जिल्ह्यात एकूण 45 लघुप्रकल्प असून, त्या 209.36 दशलक्ष घनमीटर क्षमतेच्या एकूण प्रकल्पात केवळ 85.35 दलघमी अर्थात 40.77 टक्के जलसाठा शिल्लक आहे. मे महिन्यात ती टक्केवारी अधिक घटण्याची दुश्चिन्हे आहेत. त्यामुळे जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट घोंगावत असताना सिंचन प्रकल्पांची रखडगाडी चिंताजनक आहे.