water
water Tendernama
विदर्भ

Gadchiroli : 132 कोटींची वाढीव पाणीपुरवठा योजना आचारसंहितेमुळे गेली 'पाण्यात'

टेंडरनामा ब्युरो

गडचिरोली (Gadchiroli) : शहरात दरवर्षी उन्हाळ्यात जाणवणाऱ्या पाणीटंचाईची समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी स्थानिक नगरपालिका प्रशासनाच्या वतीने तब्बल 132 कोटी रुपयांची अद्ययावत वाढीव पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव तयार करण्यात आला. तांत्रिक मान्यता प्राप्त झाल्यानंतर प्रशासकीय मान्यतेसाठी हा प्रस्ताव सरकारकडे सादर करण्यात आला आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने या योजनेचा प्रस्ताव अडकून पडला आहे.

नगरोत्थान पाणीपुरवठा टप्पा-2 अंतर्गत सदर पाणी योजनेचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर तीन-चार महिन्यांत विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहेत. त्यामुळे मध्यंतरीच्या दोन महिन्यांत संपूर्ण प्रक्रिया होऊन या योजनेचे काम हाती घेणे आवश्यक आहे. मात्र, प्रशासकीय मान्यता, निधीची तरतूद, ई-निविदा प्रक्रिया आदींसह बरेच सोपस्कार पार पाडावे लागणार आहेत. 2024 हे निवडणुकीचे वर्ष असल्याने सदर योजनेचे काम 2024 या वर्षात सुरू होते की काय, असा प्रश्न गडचिरोलीकरांसमोर निर्माण झाला आहे.

नगरपालिकानिर्मितीच्या काळापासून शहरात जुनी पाणीपुरवठा योजना आहे. त्यावेळची लोकसंख्या गृहित धरून ही पाणी योजना कार्यान्वित करण्यात आली. दरम्यान, जिल्हास्थळ असल्याने गडचिरोली शहरातील लोकसंख्या झपाट्याने वाढली. अनेक भागात वाढीव वस्ती निर्माण झाल्या. कुटुंबांची संख्या दुपटीवर पोहोचली. त्यातल्या-त्यात नळपाइप लिकेज, व्हॉल्व्हमध्ये बिघाड, तसेच क्षमतेने कमी असलेली ही पाणी योजना आता गडचिरोलीकरांसाठी अपुरी ठरत आहे. परिणामी शहरवासीयांना दरवर्षी उन्हाळ्यात नळाचे पुरेसे पाणी मिळत नाही. ही समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी पालिका प्रशासनाच्या वतीने नवीन अद्ययावत पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव तयार करण्यात आला. तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर या योजनेचा प्रस्ताव आयुक्त कार्यालय, नगरपालिका संचालनालय मुंबईकडे दीड महिन्यापूर्वीच सादर करण्यात आला असल्याची माहिती न. प. च्या सूत्रांकडून मिळाली आहे. नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्यास शहरातील पाणीटंचाईची समस्या दूर होऊ शकते.

टू-इन-वन योजना : 

सदर पाणी योजना ही विद्युत, तसेच सौर ऊर्जेवर कार्यान्वित करण्यात येणार आहे. सदर योजनेचा 50 टक्के वीज भार हा सौर ऊर्जेवर राहणार आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला तरी पाणीपुरवठा खंडित होणार नाही. सदर योजनेच्या नळ पाणीपुरवठ्यात कुठलाही अडथळा येणार नसून सातत्य राहणार आहे. त्या अनुषंगाने अनेक नव्या अत्याधुनिक बाबींचा या योजनेत समावेश आहे.

अशी होणार प्रक्रिया : 

आयुक्त कार्यालयाच्या वतीने पाणी योजनेच्या प्रस्तावाची तपासणी व पडताळणी करण्यात येणार आहे. या कार्यालयाची मंजुरी मिळाल्यानंतर मंत्रालयाच्या बैठकीत हा प्रस्ताव सादर होईल. शासन निर्णयानंतर नगरपालिका प्रशासनाच्या वतीने या पाणी योजनेची निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पाणीपुरवठा टप्पा 2 अंतर्गत वाढीव पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव आयुक्त कार्यालय, नगरपालिका संचालनालय, मुंबई येथे सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाची तपासणीअंती शासनाच्या वतीने याला मंजुरी देण्यात येणार आहे. अशी प्रतिक्रिया गडचिरोली न.प पाणीपुरवठा विभागचे अभियंता सुजित खामनकर ने दिली.

अशी आहे नवी पाणी योजना : 

वाढीव लोकसंख्येला विचारात घेऊन न. प. प्रशासनाच्या वतीने तब्बल 132 कोटी रुपयांच्या नव्या पाणी योजनेचा आराखडा तयार करून तो नगर विकास विभागाच्या आयुक्त कार्यालयात सादर करण्यात आला आहे. या नव्या पाणी योजनेत गोकुलनगर व इंदिरानगर येथे स्वतंत्र पाणी टाकी तयार करण्यात येणार आहे. नवीन पाइपलाइन, इंटेकवेल खोदण्यात येणार आहे. याशिवाय फिल्टर प्लांटवर एक मोठा पंप बसविण्यात येणार आहे.