Nitin Gadkari
Nitin Gadkari Tendernama
विदर्भ

गडकरींनी विषय सोडून दिल्याने अजनी रेल्वे पुलावरचा प्रवास खडतरच

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : तथाकथित पर्यावरणप्रेमी आणि स्वयंघोषित स्वयंसेवकांचे उठसूठ आंदोलने आणि कोर्टकचेऱ्यांमुळे अजनी रेल्वे उड्डाण पूल आठ पदरी करण्याचा इरादा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सोडून दिला आहे. त्यामुळे या पुलावरूचा प्रवास खडतरच राहणार आहे.

अजनी रेल्वे स्टेशन, रेल्वे उड्डाण पुल तसेच शेजारची जागा अधिग्रहित करून नितीन गडकरी यांनी मोठा प्रोजेक्ट हाती घेतला होता. यामुळे शहराच्या चारही बाजूने अजनी स्थानकावर पोहचणे सहज सोपे होणार होते. याशिवाय वाहतुकीची कोंडी आणि पार्किंगची समस्याही टळणार होती. याशिवाय रेल्वे, मेट्रो रल्वे, खाजगी ट्रॅव्हल्स, एसटी बस पकडण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी भटकंती करवी लागणार नव्हती. मात्र पर्यावरण प्रेमी आणि शिवसेनेच्या एका युवा नेत्याने या प्रकल्पात खोडा घातला. काटेरी झुडपाला वन संबोधून मोठी मोहीम उघडली. कोर्टातही याचिका दाखल करून विरोध दर्शवला. रेल्वे, जलसंपदा विभाग, जेल प्रशासनाची जागा अधिग्रहित होणार असल्याने काही अधिकाऱ्यांनी आंदोलकांना खतपाणी घातले. त्यामुळे नितीन गडकरी यांनी हा प्रकल्पच सोडून दिला. याकरिता १२०० कोटी रुपये मंजूर झाले होते. तेसुद्धा आता परत गेले आहेत.

या सर्व घडामोंडीचा सर्वाधिक फटका अजनी पुलावरून रोज जाणे-येणे करणाऱ्या सर्व सामान्यांना बसणार आहे. ब्रिटीशकालीन हा पूल जीर्ण झाला आहे. त्याचे आयुष्य संपले आहे. ब्रिटीश सरकारने १०० वर्षे पूर्ण झाल्याने या पुलाची जबाबदारी संपली असल्याचे कळविले आहे. पुलाच्या संरक्षण भिंतीला तडे गेले आहेत. त्यामुळे लोखंडी बॅरिकेड्‍स लावून तात्पुरता सुरक्षेचा उपाय करण्यात आला आहे. जड वाहनांची वाहतूक रोखण्यासाठी पुलाच्या तोंडावर लोखंडी खांबे बसवण्यात आली आहे. चारही दिशेने वाहतूक या पुलावर येते. त्यामुळे रोज सकाळी नऊ ते अकरा आणि सायंकाळी पाच ते रात्री नऊ या दरम्यान या पुलावर प्रचंड वाहतुकीची कोंडी होते. दीडशे फुटाचे अंतर कापण्यासाठी अर्धा तास लागतो. स्वतः गडकरी यांनीच हात काढून टाकल्याने या पुलावरून जाताना तारेवरची कसरत कायमच करावी लागणार आहे.