Nagpur
Nagpur Tendernama
विदर्भ

तहान लागल्यावर विहीर खोदणार का?; टंचाईची कामे फायलीतच

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : वाढत्या तापमानासोबत गावपातळीवर पाण्याची टंचाई भासू लागत आहे. एप्रिल महिना संपत आल्यावरही अद्याप टंचाई आराखड्यातील तिसऱ्या टप्प्याची कामे जिल्ह्यात सुरू झालेली नाही. त्यामुळे अनेक गावांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. प्रशासनाचे अद्याप आराखडेच अंतिम झाले नाही. सर्व कामे फायलीतच आहे. प्रशासन गारव्यात सुस्त असून गावातील नागरिक त्रस्त असल्याचे चित्र आहे.

तिसऱ्या टप्प्यामध्ये २६२ गावांमध्ये ४४७ उपाययोजनांवर ३ कोटी १० लाखांच्या कामांना प्रस्तावित टंचाई आराखड्यात तयार करण्यात आला. विशेष म्हणजे, गत दोन वर्षांपासून जिल्ह्यात नव्याने बोअरवेल करण्याऐवजी आहे त्या बोअरवेललाच (निर्लेखीत केलेल्या बोअरवेल) पुनर्जीवित करून ते पाण्याचा स्त्रोत म्हणून वापरण्यासाठी ‘फ्लशिंग’ करण्यावर भर आहे. यंदा एप्रिलमध्येच पाऱ्याने ४२ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला आहे. नैसर्गिक जलस्त्रोत आटलेले पाहायला मिळतात. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे.

काटोल व नरखेड तालुक्यातील गावांना सर्वाधिक झळ बसत असल्याचेही टंचाई आराखड्यात नमूद आहे. तरीही नळ योजना विशेष दुरुस्ती, विशेष विंधन दुरुस्ती, तात्पुरती नळ योजना आदी कामे सुरू होऊ शकली नाही. सुरवातीला पाणीपुरवठा विभाग जलजीवन मिशनमधून नागपूर जिल्हा टॉपटेनमध्ये आणण्यात व्यस्त होता. त्यानंतर मार्च एण्डिंगची धावपळ सुरू झाली नंतर पंचायत राज समितीच्या दौऱ्याची लगबग होती. या सर्व गुंगागुंतीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचे टंचाईच्या कामाकडे दुर्लक्ष झाले.

तालुकास्तरावरून कामांचे आराखडे मुख्यालय आले आहे. ते मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येतील. परंतु गाव पातळीवर टंचाईच्या अनुषंगाने टँकरद्वारे पाणी पुरवठा, विहीर अधिग्रहणाची कामे सुरू झाली आहे. फ्लशिंग व इतर कामे लवकरच सुरू होतील.

- योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.