Smart City
Smart City Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Smart City Nashik : सीसीटीव्हीचे काम 6 महिन्यांत पूर्ण होणार का?

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : स्मार्ट सिटी योजनेतून (Smart City Nashik) नाशिक शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह वायफाय, स्मार्ट सिग्नल यंत्रणा, पब्लिक ॲड्रेस सिस्टिम, पूर सेंसर, पर्यावरण सेंसर आदी यंत्रणा बसवल्या जाणार आहेत. ही सर्व कामे महाआयटी कंपनीच्या माध्यमातून सुरू आहेत. ही १५९ कोटींची कामे मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करणे बंधनकार असताना आतापर्यत केवळ २१ टक्के कामे झाली आहेत. त्यामुळे पुढील सहा महिन्यांमध्ये ७९ टक्के काम करण्याचे महाआयटीसमोर आव्हान आहे. दरम्यान पावसाळ्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम बंद असल्यामुळे सध्या वायफाय, पब्लिक ॲड्रेस सिस्टिम आदी कामे सुरू असल्याची माहिती स्मार्ट सिटीतर्फे देण्यात आली.

स्मार्टसिटी योजनेतून नाशिक शहरात सर्विलन्स, वाहनांच्या नंबरप्लेट व रात्रीच्या वेळी प्रतिमा घेऊ शकणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम सुरू आहे. साधारणपणे ३७१ ठिकाणी ८०० कॅमेरे बसवले जाणार आहेत. तसेच ५० ठिकाणी वायफाय, २० ठिकाणी पब्लिक ॲड्रेस सिस्टिम, २६ ठिकाणी पर्यावरण सेंसर व २० ठिकाणी पूर सेंसर उभाऱण्यात येणार आहे. केंद्र व राज्याच्या सूचनेनुसार १५९ कोटींचे हे काम महाआयटी या कंपनीला चार वर्षापूर्वी दिले असून ते काम पूर्ण करण्यासाठी मार्च २०२३ ची मुदत देण्यात आली आहे. ठेकेदार कंपनीला पहिल्या टप्प्यात ५५ कोटी रुपये निधी दिला. मात्र, संपूर्ण रकमेसाठी संबंधित कंपनी हटून बसल्यामुळे मधल्या काळात या कामाबाबत काहीही प्रगती झाली नाही.

दरम्यान केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत कमांड अँड कंट्रोल रूम तयार असणाऱ्या सर्व शहरांत सीसीटीव्ही बसवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्याच्या सूचना दिल्या. यामुळे पूर्ण रक्कम दिल्याशिवाय काम करणार नाही, हा हेका महाआयटीच्या ठेकेदाराला सोडावा लागला. त्यानंतर तीन महिन्यापूर्वी कामाला सुरुवात झाली होती. मात्र, जेमतेम दोनशे कॅमेरेच बसवण्यात आल्यानंतर पावसाळा सुरू झाला व महापालिकेने पावसाळ्यात रस्ते खोदण्यास मनाई केल्यामुळे सीसीटीव्ही बसवण्याचे काम थांबले आहे. यामुळे संबंधित कंपनीकडून इतर कामे सुरू आहेत.

या योजनेतून नाशिक शहरात ५० ठिकाणी वायफाय बसवले जाणार आहे. आतापर्यंत पाच ठिकाणी हॉटस्पॉट बसवण्यात आले आहे. शहर वासीयांना गोदावरीची पूर पातळी वेळेत समजावी यासाठी २० ठिकाणी पूर सेंसर बसवण्याचे प्रस्तावित असून आतापर्यंत ११ सेंसर बसवले आहेत. शहरातील प्रदूषणाची पातळी समजण्यासाठी २६ ठिकाणी पर्यावरण सेंसर बसवले जाणार असून, आतातपर्यंत केवळ एक सेंसर बसवले आहे. शहरातील सर्व ४९ सिग्नल एकमेकांना जोडण्याची यंत्रणा बसवली जाणार आहे. याद्वारे एका सिग्नलवरून वाहन सुटल्यानंतर त्या मार्गावरील सर्व सिग्नलवरती त्या वाहनाला हिरवा दिवा दिसू शकणार आहे. यामुळे वाहनचालकांचा सिग्नलवर थांबण्यापासून सुटका होऊ शकणार आहे.

दरम्यान, या योजनेून ३७१ ठिकाणांवर कामे करायची असून, आतापर्यंत केवळ ७८ म्हणजे २१ टक्के कामे झाली आहेत. तसेच सीसीटीव्ही कॅमेरेही केवळ २१९ ठिकाणी बसवले आहेत. ही सर्व कामे पुढील वर्षी मार्च अखेरपर्यंत पूर्ण करायची असून त्यासाठी केवळ सहा महिने उरले आहेत. त्यामुळे ही सर्व कामे सहा महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचे स्मार्टसिटी कंपनी व महाआयटी या दोघांसमोर आव्हान आहे.

पावसाळ्याचे दिवस असल्याने शहरतील रस्त्यांवर काम करता येत नाही. यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम थांबले आहे. तूर्तास २१९ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

- सुमंत मोरे, सीईओ, स्मार्ट सिटी