नाशिक (Nashik): नाशिक शहरात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने रस्ते, पूल, सुशोभिकरण, मलनिस्सारण केंद्र, मल वाहिकांचे जाळे आदी कामे सुरू आहेत. त्यातील रस्त्यांची कामे करण्यापूर्वी तेथे विविध प्रकारच्या ८ युटिलिटी (उपयुक्त सुविधा) उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यामुळे संपूर्ण शहर खोदून ठेवल्याची टीका होत असताना नाशिक महापालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांनी शहरातील सर्व रस्ते व इतर विकासकामे फेब्रुवारी २०२७ पूर्वी पूर्ण केली जातील, असा विश्वास व्यक्त केला आहे.
नाशिक शहरातील रस्त्यांच्या कामांमुळे नाशिककरांची गैरसोय होत आहे. पहिल्याच पावसानंतर नागरिकांचे मोठ्याप्रमाणावर हाल झाले. याबाबत आयुक्त मनीषा खत्री म्हणाल्या की, शहरातील रस्त्यांची कामे एकाचवेळी हाती घेतली गेल्याने गैरसोय होत आहे, हे खरे आहे. पण सिंहस्थ तोंडावर आल्याने प्रशासनाने विक्रमी वेळात विकास आराखडा तयार करून कामे हाती घेतली आहेत. ती कामे करताना पुढील २५ वर्षांचा विचार करण्यात आला असून त्यासाठी शहरातील प्रमुख २८ रस्त्यांच्या कामापर्वी भुयारी गटार, पाणीपुरवठा, फायबर ऑफ्टिकल केबल, एमएनजीएल, महावितरण अशी ८ प्रकारची युटीलिटीची कामे पूर्ण करण्याचा निर्णय झाला. ही कामे जवळपास ९९ टक्के पूर्ण झाली आहेत.
आता पावसाळ्यानंतर या रस्त्यांच्या अस्तरीकरणाच्या कामास सुरुवात केली जाईल व ती कामे फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
गोदावरीत थेट मलजल मिसळणे बंद होणार
सिंहस्थापूर्वी गोदावरीत मलजल मिसळणे पूर्णपणे बंद करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहेत. त्यासाठी महापालिकेतर्फे शहरातील १९ नाले निश्चित करण्यात आले. या नाल्यांचे पाणी थेट गोदावरीत मिसळत होते. हे सर्व नाले एसटीपीला जोडण्यासाठी जाळे तयार केले जात आहे. यामुळे मलजल व सांडपाणी गोदावरीत मिसळणार नाही.
तसेच शहरातील एसटीपी प्लॉन्टमुळे सांडपाणी प्रक्रियेच्या क्षमतेत वाढ होणार असून हे सर्व मलनिस्सारण केंद्र हॅम योजनेतून उभारले जात असल्याने त्यातून बाहेतर पडणा-या पाण्याच्या गुणवत्तेवर त्याला देयक दिले जाणार आहे. यामुळे गोदावरी प्रदूषणमुक्त होईल, असा दावा आयुक्त खत्री यांनी केला आहे.
त्याचप्रमाणे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नंदीनी नदीचे पाणी टाकळी येथील एसटीपीला पाइपलाईनद्वारे जोडण्यात येत आहे. या पाण्यावर प्रक्रिया करूनच ते गोदावरीत सोडण्यात येणार आहे. हे काम प्रगतिपथावर आहे. ते पूर्णत्वास आल्यानंतर टाकळी येथे गोदावरी व नंदिनी संगमावरील पाण्याची गुणवत्ता तपासणीबद्दल आपण स्वत: जातीने लक्ष घालणार असल्याचे असल्याचे महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी सांगितले. नंदिनी नदी प्रदूषण मुक्तीसाठी स्वतंत्र ३५० कोटींचा निधी प्रस्ताव जागतिक बँकेकडे सादर केल्याची त्यांनी सांगितले.
नाशिक महापालिकेतर्फे केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाच्या निधीतूत द्वारकाचौक ते नाशिक रोड विस्तारीकरणास मान्यता मिळाली आहे. त्या कामाची टेंडर प्रक्रिया सुरू असून विधान परिषद निवडणुकीचा आचारसंहिता संपल्यानंतर ठेकेदारास कार्यारंभ आदेश दिले जातील.
या मार्गाचे ४५ मीटर विस्तारीकरण केले जाणार असून ९५ टक्के जागा ताब्यात आहे. त्यामुळे कामात कोठेही अडचण येईल, असे वाटत नाही. हा रस्ता करताना साधारण पाच मोठ्या चौकांमध्ये वाहतूक कोंडी होणार नाही, याप्रमाणे नियोजन केले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.