Nashik ZP CEO
Nashik ZP CEO Tendernama
उत्तर महाराष्ट्र

NashikZP: जलजीवन योजनेचा आराखडा ग्रामपंचायतींना देण्याचा आदेश

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : जलजीवन मिशनच्या (Jal Jeevan Mission) पाणी पुरवठा योजनांची कामे मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करायची आहेत. आता हातात केवळ १४ महिने उरले असल्यामुळे कामे गुणवत्तपूर्ण होण्यासाठी प्रत्येक गावातील पाणीपुरवठा योजनेचा आराखडा संबंधित ग्रामपंचायतीकडे देण्याच्या सूचना नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल (Nashik ZP CEO Amisha Mittal) यांनी दिल्या आहेत.

या आराखड्यानुसार कामे होतात की नाही, यावर सरपंच व ग्रामसेवक यांनी लक्ष ठेवायचे आहे. यामुळे गटविकास अधिकाऱ्यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीकडे त्या त्या योजनेचा आराखडा द्यावा, अशा सूचना मित्तल यांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिल्या.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी नुकतीच सर्व विभागप्रमुख व सर्व गटविकास अधिकारी यांची समन्वय सभा घेतली. या बैठकीत गटविकास अधिकारी यांच्याकडून राज्य व केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा घेण्यात आला. आचारसहिंता संपल्यानंतर प्रलंबित कामे वेगाने करावी, निधी अखर्चित राहता कामा नये, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी त्यांनी जलजीवन मिशनमधून मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेतला. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने १२९२ पाणी पुरवठा योजनांचा प्रशासकीय मान्यता दिल्या असून त्यातील काही योजनांचे कार्यारंभ आदेश देणे बाकी आहे. बहुतांश योजनांचे कार्यारंभ आदेश दिले असल्यामुळे या योजना लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

दरम्यान नुकतेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ठेकेदारांसोबत बैठक घेऊन कामे वेळेत होण्यासाठी सूचना केल्या होत्या. त्यावेळी ग्रामपंचायत स्तरावर योजना हस्तांतरण करताना सरपंचांकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर असे प्रकार घडल्यास संबंधित योजना गटविकास अधिकाऱ्यांकडून हस्तांतरित केली जाईल, असे आश्‍वासन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले होते. यामुळे जिल्हाभरातील सरपंचांनी आमच्या अधिकारावर गदा आणू नये, अशी भूमिका घेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सरपंचांचे अधिकार काढले जाणार नाहीत. उलट योजनांची अंमलबजावणी सरपंचांनीच करून घ्यावी, अशा सूचना केल्या होत्या. मात्र, सरपंचांनी आमच्याकडे योजनेचा आराखडा नसतो. त्यामुळे ठेकेदारांनी आराखड्यानुसार कामे केली किंवा नाही, हे समजत नसल्याचे लक्षात आणून दिले होते. यामुळे समन्वय बैठकीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनी प्रत्येक पाणी पुरवठा योजनेचा आराखडा संबंधित ग्रामपंचायतीकडे देण्याच्या सूचना गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

जलजीवन मिशनमधील पाणीपुरवठा योजना वेळेत व गुणवत्तापूर्ण व्हाव्यात यासाठी लवकरच प्रत्येक तालुकानिहाय सरपंच व ग्रामसेवक यांचे प्रशिक्षण घेतले जाणार असून, त्यात त्यांना जलजीवन मिशनमधील कामांची माहिती दिली जाणार असल्याचेही मित्तल यांनी सांगितले.