Nashik
Nashik Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik: मिर्ची चौकातल्या उड्डाणपुलाचे घोडे अडले कोठे?

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : येथील छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील मिर्ची हॉटेलजवळ झालेल्या अपघातानंतर या भागात उड्डाणपूल तयार करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (PWD) अद्याप कुठलेही कार्यवाही होत नसल्याने महापालिकेला अखेरीस स्मरणपत्र पाठवण्याची वेळ आली आहे.

महापालिका आयुक्तांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सदाशिव साळुंखे यांना स्मरणपत्र पाठवण्यात आले. चवटी विभागातील छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील हॉटेल मिर्ची चौकात ऑक्टोबर २०२२ मध्ये पहाटे बसचा मोठा अपघात झाला. अपघातानंतर बसला आग लागून यात १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन अपघातग्रस्त ब्लॅक स्पॉट शोधण्याबरोबरच छत्रपती संभाजीनगर महामार्गावर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, शहर पोलिस वाहतूक शाखा, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व नाशिक महापालिकेकडून संयुक्त सर्वेक्षण करण्यात आले. त्याचबरोबर अपघात टाळण्यासाठी छत्रपती संभाजीनगरनाका ते नांदूरनाका या दरम्यान उड्डाणपूल उभारण्याची शिफारस रेझिलिएंट इंडिया या सल्लागार संस्थेने केली.

वाहतूक कोंडी व अपघात कमी करण्यासाठी द्वारका ते दत्तमंदिर दरम्यान उड्डाणपूल उभारला जाणार आहे. त्याच धर्तीवर हा पूल उभारावा, अशी सूचना कंपनीकडून करण्यात आली. हा रस्ता राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विकसित करण्यात आला आहे. त्यामुळे राज्याच्या बांधकाम विभागाने उड्डाणपूल उभारण्याची जबाबदारी घ्यावी, अशी विनंती महापालिकेने राज्य शासनाकडे केली.

त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने देखील सरकारकडे प्रस्ताव पाठवला व राज्य मंत्रिमंडळात त्याला मान्यतादेखील मिळाली. मात्र, अद्यापपर्यंत कुठलीही कार्यवाही झालेली नाही. पूल उभारण्यासंदर्भात कागद हलत नसल्याने अखेरीस महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सदाशिव साळुंखे यांना स्मरणपत्र पाठवून उड्डाणपूल उभारण्यासंदर्भात कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.

पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती

सरकारच्या सूचनेनुसार रेझिलिएंट इंडिया या सल्लागार संस्थेने नाशिक शहरातील अपघातग्रस्त ब्लॅक स्पॉटचे सर्वेक्षण केले. यात शहरात २६ ब्लॅक स्पॉट असल्याचे आढळून आले. शहरातील २६ ब्लॅक स्पॉट निश्चित करताना तेथील वाहतुकीची कोंडी, अपघाताचे प्रमाण याची आकडेवारीदेखील सादर करण्यात आली. त्यावर उपाययोजना करण्यासाठी महापालिकेला सूचना देण्यात आल्या. त्याअनुषंगाने उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी अंतिम टेंडर काढले जाणार आहे. पावसाळ्यापूर्वी अपघातांचे ब्लॅक स्पॉट दुरुस्त केले जाणार असल्याचे महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.