samruddhi expressway Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik: 'समृद्धी'ला जोडण्यासाठी नाशिकहून थेट रस्त्याची गरज नाही? काय म्हणाल्या मंत्री बोर्डीकर?

आमदार सत्यजित तांबे यांनी विधानसभेत उपस्थित केला प्रश्न

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik): हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा उर्वरित महाराष्ट्राच्या प्रगतीचे द्वार समजले जात असताना या समृद्धी महामार्गाला नाशिकहून थेट जोडणारा समृद्धी कनेक्टर रद्द का केला? हा कनेक्टर रद्द झाल्याने नाशिक शहरातील नागरिकांना 'समृद्धी'वर जाण्यासाठी ५० किलोमीटर प्रवास करावा लागतो. या कनेक्टरसाठी ५०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते व भूसंपादनही झाले होते. तरीही तो मार्ग रद्द का केला, असा प्रश्न आमदार सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत उपस्थित केला.

त्यावर राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी नाशिकहून समृद्धीपर्यंत ४०-५० किलोमीटर प्रवास करावा लागतो, हा काही फार मोठा विषय नसल्याचे सांगत या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले.

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग हा नाशिक जिल्हयातील सिन्नर व इगतपुरी तालुक्यात जातो. नाशिक शहरातून या महामार्गापर्यंत जाण्यासाठी नाशिक-पुणे महामार्ग व मुंबई आग्रा महामार्ग यापैकी कोणत्याही मार्गावरून गेले तरी साधारण ५० किलोमीटर अंतर आहे. या महामार्गावरील खड्डे व इतर कारणांमुळे 'समृध्दी'पर्यंत पोहोचण्यास वेळ जातो. यामुळे नाशिकहून 'समृद्धी'पर्यंत जाण्यासाठी थेट रस्ता मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे नाशिकहून समृद्धी महामार्ग  केवळ ३० किलोमीटर वर येणार होता.

या समृद्धी कनेक्टरसाठी केंद्र सरकारने ५००कोटी रुपये निधी मंजूर केला होता. त्यानुसार त्या रस्त्यासाठी भूसंपादनही करण्यात आले. मात्र, त्यानंतर हा रस्ता रद्द करण्यात आला. यामुळे पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत हा प्रश्न उपस्थित केला.

समृद्धी महामार्ग नकाशावर जवळ असला तरी नाशिककरांना समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी इगतपुरीपर्यंत प्रवास करावा लागतो, खराब रस्त्यांचा सामना करावा लागतो आणि राष्ट्रीय महामार्ग व समृद्धी या दोन्ही ठिकाणी टोल भरावा लागतो यावर कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत,असा प्रश्न त्यांनी विचारला.

याशिवाय उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नंदुरबार, मालेगाव, सटाणा, कळवण या भाग 'समृद्धी'ला जोडण्यासाठी काय उपाययोजना करणार व नाशिकसाठी मंजूर 500 कोटी रुपयांचा कनेक्टर प्रकल्प रद्द का करण्यात आला? संपादित जमीन वापरात का आणली जात नाही, असेही त्यांनी विचारले.

यावर राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी डबल टोलचा दावा फेटाळत 'समृद्धी'वर इंटरचेंजपासून प्रतिकिलोमीटर दरानेच टोल आकारला जात असल्याचे सांगितले. नाशिककरांना 30-50 किमी प्रवास हा मोठा अडथळा नसल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यांना 'समृद्धी'ला जोडण्यासाठी पाच इंटरचेंज उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले.